Join us

महात्मा फुले जयंती : जेव्हा जोतिबा फुल्यांनी व्हिक्टोरिया राणीसमोर शेतकऱ्यांची कैफियत मांडली!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 11:52 AM

महात्मा ज्योतिराव फुले यांनी शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथात शेतकऱ्यांचे शोषण करणाऱ्या सावकार, महाजन आणि सरकारवर असूडाने फटकारले आहे. 

आधुनिक भारताचे शिल्पकार महात्मा जोतीराव फुले यांनी आपल्या समग्र जीवन कार्यातून या राष्ट्राला समृद्ध आणि संपन्न केलं आहे. आपल्या विचारांना  कृतीशीलतेची जोड देवून या राष्ट्राची पायाभरणी केली. शिक्षणातूनचं प्रत्येक व्यक्तीची आणि समाज घटकांची प्रगती होऊ शकते, यासाठी त्यांनी अखेरच्या श्वासासापर्यंत प्रयत्न केले. शिक्षण नसल्याने या देशातील शेतकरी, कष्टकरी व सामान्य समाज कशा प्रकारे शोषित किंवा पराभूत मानसिकतेचा बनला, यावर आपल्या अखंडात त्यांनी म्हटले, विद्येविना मती गेलीमती विना निती गेलीनिती विना गती गेलीगती विना वित्त गेलेवित्ता विना शूद्र खचलेऐवढे अनर्थ एका अविद्येने केले.

इथल्या कष्टकरी समाजाला शिक्षण देवून त्यांच्यामध्ये विज्ञानवादी दृष्टिकोन, तर्क आणि चित्किसा करण्याची क्षमता निर्माण केली. तृतीय रत्न (१८५५ ), ब्राम्हणाचे कसब ( १८६९), गुलामगिरी ( १८७३), शेतकऱ्याचे आसूड (१८८३ ) , सार्वजनिक सत्यधर्म ( १८९१ )अशा ग्रंथ रचनेतून त्यांनी या देशातील शोषित वर्गाची व्यथा वेदना मुर्खरर केली.

हंटर शिक्षण आयोगाला त्यांनी जे निवेदन सादर केले, त्यात त्यांची शैक्षणिक मते स्पष्ट झालेली आहेत. प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले जावे, ही मागणी करणारे जोतीराव हे पहिले भारतीय होते. खेड्यातील मुलाना कृषी विषयक तांत्रिक शिक्षण द्यावे. कृषी शिक्षणासाठी प्रात्याशिक स्वरूपातील आदर्श शेता ची योजना आखावी. शेतकऱ्यांच्या मुलांना कृषी विषयक उच्च शिक्षण देण्यासाठी युरोपातील शेती प्रगत देशात पाठवावे, अशा मौलिक सूचना या निवेदनात त्यांनी केलेल्या होत्या. शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथात त्यांनी शेतकऱ्यांचे शोषण करणाऱ्या सावकार, महाजन आणि सरकारवर असूडाने फटकारले आहे.  यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांची मूलगामी चर्चा करून ती सुधारण्यासाठी शेतकऱ्यांच्या सर्वांगीन प्रगतीचा आकृतीबंध मांडला आहे.

एक प्रसंग असा आहे की, तत्कालीन ब्रिटिश सरकार असताना महात्मा जोतीराव फुले हे शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून व्हिक्टोरिया राणीसमोर गेले. त्यावेळी फुले यांनी शेतकऱ्यांची कैफियत मांडली. तेव्हा त्यांनी सांगितलं की भारतातल्या शेतकऱ्यांना परदेशी युरोपामध्ये प्रशिक्षणासाठी, त्यांना आधुनिक शेतीसंदर्भातील शिक्षण द्या, म्हणजे या भारतात आधुनिक शेतीचा विचार रुजेल. महात्मा फुले यांच्या या मागणीकडे ब्रिटिश सरकारने लक्ष दिले नाही. त्यावेळी ही गोष्ट झाली असती तर आज भारतात आज चांगली कृषी संपन्नता पाहायला मिळाली असती. त्यामुळे शेती आणि शेतकरी यांच्याकडे प्रामुख्याने लक्ष देण्याची गरज आहे, जी गरज महात्मा फुले यांनी अचूक ओळखली होती.

याचबरोबर महात्मा फुले यांनी जमीनीची धूप आणि सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी वृक्षारोपणाचे महत्व आणि  शेती सुधारणा  व वृक्षारोपणासाठी सैनिकांची मदत कशी घेता येईल .  बंधारे , तलाव बांधून पाण्याचे व्यवस्थापन, शेतकऱ्यासाठी वार्षिक प्रदर्शने, उत्तम पीक घेणाऱ्याला पुरस्कार, शेतकऱ्याची चोरी झालीतर पोलिसांना दंड, शेतकऱ्यांना अल्प व्याज दरावर कर्ज, उत्तम प्रकारची बियाणे, शेतीला आधुनिक उपकरणाची जोड, गुरांची उत्तम निपज, सावकारीमुळे होणारे शेतकऱ्याचे शोषण अशा अनेक प्रश्नांवर त्यांनी उपाययोजनेसह मीमांसा केली आहे.

लेखक :

प्रा. डॉ. सुधीर इंगळेविभाग प्रमुखजनसंवाद आणि वृत्तपत्रविद्या विभागश्री शिवाजी महाविद्यालय,परभणी

टॅग्स :शेतीमहात्मा फुले वाडासावित्रीबाई फुलेशेती क्षेत्र