Pomegranate Theft : एकीकडे शेतकरी वर्षभर मेहनत करून शेती फुलवत असतो. दुसरीकडे विक्रीला आलेला माल चोरीला जातो. गेल्या काही वर्षात शेतमाल चोरीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. अशीच एक घटना अहिल्यानगर जिल्ह्यातील (Ahilyanagar) श्रीरामपूर तालुक्यात घडली आहे. एका डाळींब उत्पादक शेतकऱ्याची अख्खी डाळींब बागच चोरटयांनी चोरून नेली आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील दिघी येथील डाळींब उत्पादक शेतकरी (Pomegranate Farming) सतीश कुंडलिक जाधव यांची शेती आहे. जाधव यांची डाळिंब बाग असून जवळपास सातशे झाड आहेत. ही बाग काढणीला आली असताना यातील सातशे झाडांपैकी जवळपास ३०० झाडांवरील डाळिंब चोरून नेण्यात आले आहेत. सध्याच्या दरानुसार जवळपास अंदाजे ४ लाख रुपये किंमतीचा साडेतीन टन माल चोरून नेण्यात आला आहे.
याबाबत जाधव यांनी श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे. सध्या डाळिंबाला बाजारपेठेमध्ये विक्रमी भाव मिळत असल्याने डाळींब चोर सक्रिय झाले आहेत. जाधव यांच्या सोबत अजूनही 3-4 शेतकऱ्यांचे डाळींब चोरट्यांनी लंपास केले असल्याची तक्रारी पोलीस स्टेशनला दाखल झाल्या आहेत. श्रीरामपूर पोलीस प्रशासनाने तत्काळ या डाळींब चोरांचा बंदोबस्त करावा. तालुक्यातील डाळींब उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.
काय मिळतोय दर सध्या डाळिंब बाग काढणीला आल्या असून बाजारात आवक वाढली आहे. शिवाय बाजारात डाळींबाला भावही चांगला मिळतात आहे. अशा स्थितीत जाधव यांच्यासह इतर शेतकऱ्यांचे डाळींब चोरून नेण्यात आल्याने शेतकऱ्याला आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. सध्या डाळिंबाला कमीत कमी ५ हजार रुपयापासून ते १२ हजार रुपयांपर्यंत दर मिळतो आहे. यात भगव्या डाळिंबाला क्विंटलमागे सरासरी १२ हजार १०० रुपये दर मिळतो आहे.