Join us

गतवर्षाच्या तुलनेने पेरणी ११ टक्के जास्त; नाशिक जिल्ह्यात किती झाली पेरणी? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 13:14 IST

Agriculture News : नाशिक जिल्ह्यात पावसाने चांगली हजेरी लावल्याने पेरण्यांनी वेग घेतला आहे.

नाशिक : यंदाच्या खरीप हंगामात (Kharif Season) १५ जूनअखेर केवळ १५ टक्के पेरणी झाली होती. मात्र, आठवडाभरापासून पावसाने जोर पकडल्यानंतर काही भागांत पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे पेरणीसाठी (Sowing) पोषक वातावरण झाले. वाफसा मिळाल्याने २२ जूनअखेर पेरणी क्षेत्र ३१ टक्क्यांवर आले. मागील वर्षाच्या तुलनेने पेरणी २२ जूनअखेर ११ टक्क्यांनी जास्त झाल्याने दिलासा मिळाला. 

मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतात (Avkali Paus) पाणी साचले होते. त्यामुळे यंदा मशागत लांबली. परिणामी जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पेरणीने जोर पकडला नव्हता. भाताची पेरणी मात्र रखडली असून ९३ हजार ४६७ हेक्टरपैकी केवळ १५६ हेक्टर म्हणजे ०.१७ टक्केच पेरणी २० जूनअखेर झाली आहे.

जिल्ह्यात यंदा देखील मका व सोयाबीन पिकांचे क्षेत्र सर्वाधिक राहणार असून रब्बी हंगामाप्रमाणे मात्र ज्वारीची कोठारे भरणार नाही. कारण ज्वारीची फक्त ५ टक्केच पेरणी होईल. भुईमूग क्षेत्रातही यंदा वाढ झाली आहे. काही तालुक्यांमध्ये पेरणी अजूनही रखडलेली असल्याचे आकडेवारीवरून दिसते.

बाजरी पीक 18 टक्के, मका 48 टक्के, ज्वारी 4.82 टक्के, सोयाबीन 22.5 टक्के, भात 0.17 टक्के तर कापूस 30.2 टक्के अशी अद्याप पर्यंत पेरणी झाली आहे. चांदवड, येवला, नांदगाव, देवळा, मालेगाव या तालुक्यात पेरण्यांची टक्केवारी अधिक आहे.

गतवर्षापेक्षा यंदा १७ हजार हेक्टरने पेरणी क्षेत्र कमी२०२४ च्या खरीप हंगामात सरासरी पेरणी क्षेत्र ६ लाख ५८ हजार इतके होते. तर यंदा ६ लाख ४० हजार ५५१ इतके असेल. मागील वर्षाच्या तुलनेने यंदाचे पेरणी क्षेत्र १७ हजार हेक्टरने कमी असेल. मे महिन्यातील अवकाळी पावसानंतर पेरणी क्षेत्रात बदल केला. बागलाण, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, नाशिक, दिंडोरी, इगतपुरी या तालुक्यांमध्ये पेरण्या आटोपण्याचे प्रमाणे इतर तालुक्यांच्या तुलनेने कमी आहे. कारण या तालुक्यांमध्ये वाफसा मिळण्यास उशीर होत आहे.

भाताच्या शेतात नर्सरी बनविण्याचे काम यंदा मे महिन्यातील अवकाळी पावसाने लांबले. त्यामुळे भाताची पेरणी संथगतीने झाली. मात्र, पुढील आठवड्यात भाताचे पेरणी क्षेत्र वाढेल. पावसाचे प्रमाण असेच राहिले तर सरासरी क्षेत्र यंदा पूर्ण होईल. केवळ अतिवृष्टी नको. मात्र, शेतीसाठी सध्या तरी अनुकूल वातावरण असून योग्य ती काळजी घेऊन पेरणी करावी.- अभिमन्यू काशीद, जिल्हा कृषी अधीक्षक

टॅग्स :पेरणीशेती क्षेत्रशेतीखरीप