Join us

अवकाळीने तीन एकरांवरील भात शेती उध्वस्त, भरपाई मिळाली 1080 रुपयेच...! 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 2:48 PM

गत वर्षीच्या अवकाळी पावसात झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून 1080 रुपयांची मदत शेतकऱ्याला प्राप्त झाली आहे.

भंडारा : गत वर्षीच्या अवकाळी पावसात झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून 1080 रुपयांची मदत शेतकऱ्याला प्राप्त झाली आहे. विशेष म्हणजे जवळपास तीन एकरांवरील धान भिजल्याने नुकसान झाले होते. मात्र तीन एकर जागेतील धान पिकांची नुकसान भरपाई म्हणून 1080 रुपये देण्यात आले आहे. तर सरासरी त्यांना 980 रुपयेच प्राप्त झाले आहेत. यामुळे शेतकऱ्याने संताप व्यक्त केला आहे. 

मागील वर्षी झालेल्या अवकाळी पावसात देवरी देव येथील शेतकरी आणि उपसरपंच राजेश अंबुले यांचे तीन एकर आर शेतीतील धानाचे कडपे सडले होते. धानाला कोंब फुटले होते. प्रचंड नुकसान झाले होते. यांनतर लागलीच त्रिसदस्यीय पथकाच्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यात आली. अंबुले यांच्याही तीन एकर क्षेत्रावरील धान पिकाच्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यानंतर अंबुले यांना तीन एकर जागेतील धान पिकांचे नुकसानभरपाई म्हणून 1080 रुपये देण्यात आले आहे. सरासरी त्यांना 980 रुपयेच प्राप्त झाले आहेत. यात सर्वेक्षण करणारे पथक दोषी आहेत, असा सवालही उपस्थित झालेला आहे. 

राज्य शासनाने अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश दिले होते. यानंतर तलाठी, कृषी सहायक आणि ग्रामसेवक या त्रिसदस्यीय समितीने शेतकऱ्यांचे धान पिकांचे सर्वेक्षण केले होते. प्रत्यक्षात शेतात जाऊन हे सर्वेक्षण करण्यात आले होते. देवरी देव येथील शेतकरी आणि उपसरपंच राजेश अंबुले यांचे तीन एकर आर शेतीतील धानाचे कडपे सडले होते. अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त शेतीची आर्थिक मदत प्राप्त करण्यासाठी आधी शेतकऱ्यांनी केवायसी केले. सेतू केंद्रावर त्यांना १०० रुपयांचा खर्च आलेला आहे. तर आर्थिक मदत १०८० हजार रुपये देण्यात आली आहे. प्रत्यक्षात त्यांचे हातात ९८० रुपयेच प्राप्त झाले आहेत. 

तीन एकर शेतीत असणाऱ्या धानाचे पीक सडले होते. अवकाळी पावसाचा फटका बसला होता. मात्र आर्थिक मदत फक्त १०८० रुपये देण्यात आली आहे. ही शेतकऱ्यांची कूर थट्टाच आहे. हा शेतकऱ्यांचे जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असून न्याय मिळाला नाही.

- राजेश अंबुले, शेतकरी, देवरी देव.

पुन्हा सर्वेक्षणाचे निर्देश

सध्याला भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने धान पिकांचे नुकसान झाले आहेत. धानाचे पीक जमीनदोस्त झाले आहेत. २२ ते २३ एप्रिल २०२४ पर्यंत नुकसानग्रस्त धान पिकांचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश तहसीलदार मोहन टिकले यांनी तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवकांना दिले आहे. २४ एप्रिल २०२४ चे हे आदेशीत पत्र आहे. २५ एप्रिलपर्यंत कुणीही शेत शिवारात फिरकले नाहीत. उशिरा सर्वेक्षण होत आहे. शेतकऱ्यांना धानाचे पीक सुरक्षित करण्याची घाई राहत आहे. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट होणार आहे. पारदर्शक पद्धतीने सर्वेक्षण झाले पाहिजे, असा शेतकऱ्यांचा सूर आहे.

पीक व्यवस्थापनापासून नियोजनापर्यंत, शेतीच्या सर्व अपडेट्ससाठी लोकमत ऍग्रोच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा...

टॅग्स :शेतीभंडाराशेती क्षेत्रपाऊस