कारच्या टपावरचं 'ते' भाषण... तेव्हा आणि आता! उद्धव ठाकरेंनी वापरला बाळासाहेबांचा फॉम्युला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2023 03:18 PM2023-02-18T15:18:20+5:302023-02-18T15:45:31+5:30

शिवसेना कुणाची? उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदेंची? या वादात काल निवडणूक आयोगानं मोठा निर्णय देत शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्हा शिंदे गटाला दिलं. उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्यानंतर कार्यकर्ते आज 'मातोश्री' बाहेर जमा झाले होते.

उद्धव ठाकरे यांनी काल पत्रकार परिषदत घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपा आणि निवडणूक आयोगावर जोरदार घणाघात केला. तसंच आपण अजिबात खचलेलो नाही असं सांगत कार्यकर्त्यांनाही बळ दिलं.

उद्धव ठाकरेंनी कालच्या पत्रकार परिषदेत थेट त्यांच्या देवाऱ्यातील धनुष्यबाणाची प्रतिकृती दाखवत बाळासाहेब ठाकरेंनी या पुजा केली असल्याचं म्हणत खरा धनुष्यबाण आपल्याकडेच असल्याचं सांगितलं. त्यानंतर आज मातोश्री बाहेर जमलेल्या गर्दीला संबोधित करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचाच फॉर्म्युला वापरला.

उद्धव ठाकरे यांनी कलानगर चौकात ओपन कारमधून जमलेल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं आणि एकनाथ शिंदेंसह भाजपा आणि केंद्रीय निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली. पण उद्धव ठाकरेंच्या या भाषणानं पुन्हा एकदा शिवसैनिक इतिहासात गेला आणि बाळासाहेब ठाकरेंनी केलेल्या भाषणाची आठवण झाली.

शिवसेना पक्ष स्थापनेनंतर १९६९ साली शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घेतला होता. तेव्हाही बाळासाहेब ठाकरे यांनी कारच्या टपावर उभं राहून कार्यकर्त्यांना संबोधित केलं होतं आणि पक्षासाठी धगधगत्या ज्वाळेप्रमाणे झोकून देण्याचं आवाहन केलं होतं.

आज उद्धव ठाकरेंच्या हातून शिवसेना हे नाव आणि पक्षाचं निवडणूक चिन्ह धनुष्याबाण देखील गेलं आहे. त्यामुळे बाळासाहेबांच्याच पावलावर पाऊल ठेवत उद्धव ठाकरेंनी आज रस्त्यावर येत ओपन कारमधून कार्यकर्त्यांना संबोधित केलं आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवला.

माझ्याकडे आज तुम्हाला देण्यासाठी काहीच नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भावनिक साद कार्यकर्त्यांना घातली. ज्यापद्धतीनं बाळासाहेब ठाकरेंनी रस्त्यावरुन पक्ष घडवण्यास सुरुवात केली आज आपल्यालाही तशीच शुन्यातून सुरुवात करावी लागणार आहे याची कल्पना उद्धव ठाकरेंना आली आहे. याचा भाग म्हणून उद्धव ठाकरेंनी आज निष्ठावान कार्यकर्त्यांचं कौतुक करत निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या.

शिवसेना संपवता येणं शक्य नाही. धनुष्यबाण चोरांना दिला गेला. कदाचित आपली मशाल निशाणी सुद्धा जाऊ शकते. ज्यांनी धनुष्यबाण चोरला ते जर मर्द असतील. तर त्यांनी समोर यावं आणि निवडणुकीला सामोरं जावं, असं खुलं आव्हान उद्धव ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री शिंदे यांना दिलं आहे.

बाळासाहेब ठाकरेंनी १९५९ साली फियाट गाडीवर उभं राहून भाषण केलं होतं. बाळासाहेबांचं ते भाषण गाजलं होतं. आजही बाळासाहेबांच्या त्या भाषणाचा दाखला दिला जातो. रस्त्यावरच्या शिवसैनिकांमध्ये रमणारं नेतृत्व म्हणून याचमुळे बाळासाहेब ठाकरेंकडे पाहिलं जाऊ लागलं होतं.