कोरोनाविरुद्धची लढाई... माझे कुटुंब माझी जबाबदारी ते 'मी जबाबदार'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2021 05:02 PM2021-02-22T17:02:32+5:302021-02-22T17:24:49+5:30

कोरोना महामारीच्या काळात राज्य सरकारने माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम राबवली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही आपल्या भाषणात अनेकदा या मोहिमेचा उल्लेख करताना, ही मोहीम यशस्वी झाल्याचे सांगितले. त्यामुळेच, आता दुसऱ्यांदा कोरोनाची लाट येत असताना, मी जबाबदार ही नवी मोहीम राबविण्यात येत आहे.

देश आणि राज्यावर आलेले कोरोनाचे संकट हळूहळू कमी होत असल्याची चिन्हे असतानाच आता राज्यामध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये पुन्हा एकदा मोठी वाढ होऊ लागली आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांसह मुंबई आणि पुण्यासारख्या प्रमुख शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने चिंता वाढली आहे.

त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला. यावेळी, वाढत्या कोरोनामुळे पुन्हा एकदा कडक निर्बंध लादण्यासंदर्भात चर्चा केली. तसेच, कोरोनापासून बचावासाठी शिस्त पाळणं बंधनकारक असून आता आपण आणखी एक मोहिम राबवत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितंलं.

कोरोनाचं औषध तेव्हाही नव्हतं, आजही नाही. केवळ दिलासा तो लसीचा. सध्या लसीकरण सुरू झालं असून 9 लाख जणांना कोरोनाची लस देण्यात आलीय. आणखीन दोन-तीन कंपन्या लस देणार आहेत, त्याही लस आपल्याला लवकरच उपलब्ध होतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

मी मुख्यमंत्री म्हणून शिवनेरीवर गेलो, हे माझं भाग्यच. यावेळी, शिवनेरीवर गर्दी कमी होती, पण उत्साह मोठा होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला प्रेरणा दिली.

वार करण्यासाठी तलवार आणि वार झेलायला ढाल हवी. पण, कोरोनाविरुद्धची लढाई लढताना तलवार नाही, पण मास्क ही आपली ढाल आहे, असे उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

माझे कुटुंब माझे जबाबदारी ही मोहीम आपण यशस्वी केली, त्यानंतर आता आणखी एक मोहीम आपण राबवली पाहिजे. होय, मीच जबाबदार... प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून वागणं म्हणजेच होय मीच जबाबदार.

आपली जी बंधने आहेत, घराबाहेर पडताना मास्क, हाताला सॅनिटायझर आणि सामाजिक अंतर हे पाळालयाच हवं. पंतप्रधानांसोबतच्या बैठकीत मी एक सूचना केली. आपल्याकडे 24 तास असतात, या 24 तासांची नीट विभागणी केल्यास नियंत्रण ठेवता येईल.

वर्क फ्रॉम होमद्वारेही आपण कामाची विभागणी करु शकतो. हीच आपली नवीन मोहिम आहे, जी आपली जबाबदारी आहे, होय मीच जबाबदार... असे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.

माझं कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम राबवून कोरोना आटोक्यात आणण्यात सरकारला यश आलं,पण पुन्हा कोरोनाने डोकं वर काढलंय.

कोरोनाची दुसरी लाट पुन्हा येतेय, म्हणून राज्य सरकारने आता नवीन मोहीम राबविण्याचा संकल्प केला आहे.

जिल्हा प्रशासन आणि सर्वच पालकमंत्र्यांनीही मी जबाबदार या मोहिमेला आपल्या कार्यक्षेत्रात सुरुवात केली आहे.