२ तासाचा प्रवास २० मिनिटांत...; गेमचेंजर ठरणाऱ्या 'अटल सेतू'ची १० वैशिष्टे वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2024 12:31 PM2024-01-12T12:31:58+5:302024-01-12T12:41:32+5:30

मुंबई ट्रान्सहार्बर लिंक म्हणजेच अटल बिहारी वाजपेयी शिवडी- न्हावा शेवा अटल सेतूचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन होत आहे. डिसेंबर २०१६ मध्ये या पूलाचं भूमिपूजन करण्यात आले. अटल सेतू बांधकामासाठी २१ हजार ८४० कोटींहून अधिक खर्च करण्यात आला. हा पूल जवळपास २१.८ किमी लांबीचा आहे आणि त्यात ६ लेन आहेत.

अटल सेतू हा १६.५ किमी समुद्रावर तर ५.५ किमी जमिनीवर बनलेला पूल आहे. हा देशातील सर्वात लांब सागरी सेतू आहे. हा पूल मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ याला जोडण्याचे काम करेल. मुंबईहून पुणे, गोवा आणि दक्षिण भारतातील प्रवासासाठी लागणारा वेळ या अटल सेतूमुळे कमी होणार आहे.

अटल सेतूमुळे मुंबई बंदर आणि जवाहरलाल नेहरू बंदर यांच्यातील कनेक्टिविटी वाढणार आहे. १२ जानेवारीपासून अटल सेतू हा सर्वसामान्य प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे देशातील सर्वात लांब अशा या पूलावरून प्रवास करताना मुंबईकरांच्या वेळेची बचत आणि सागरी मार्गावरून प्रवास करण्याचा भन्नाट अनुभव मिळणार आहे.

अटल सेतूमुळे मुंबई ते नवी मुंबई यांच्यातील अंतर २० मिनिटांत कापता येणार आहे. सध्या या प्रवासाला २ तासाचा अवधी लागतो. त्यात वाहतूक कोंडीत अडकला तर त्यातून जास्त वेळ लागतो. परंतु या पूलामुळे मोठ्या प्रमाणात वेळेची बचत होईल. त्याचसोबत वाहन चालकांना वेगवान प्रवास करत मुंबईच्या वाहतूक कोंडीतून सुटका मिळेल.

अटल सेतूच्या बांधकामासाठी १ लाख ७७ हजार ९०३ मेट्रिक टन स्टील आणि ५ लाख ४ हजार २५३ मेट्रीक टन सिमेंटचा वापर करण्यात आला आहे. या पुलासाठी जवळपास २१ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. या पूलावरून दिवसाला ७० हजार वाहने प्रवास करतील अशी अपेक्षा आहे. तसेच पुढील १०० वर्ष हा पूल कायम राहणार आहे.

अटल सेतूवरून प्रवास करताना वाहन चालकांना १०० किमी प्रतितास या वेगाने प्रवास करण्याची मर्यादा आहे. तसेच या सागरी महामार्गावर अवजड वाहने, दुचाकी, ऑटो रिक्षा आणि ट्रॅक्टर नेण्याची परवानगी नाही. हा सेतू मार्ग विविध जोडरस्त्यांनी मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, वसई-विरार, नवी मुंबई, रायगड जिल्ह्याला जोडला जाणार असल्याने यामधील अंतर कमी होणार आहे

पावसाळ्याच्या दिवसात वेगवान वारे आणि वादळाचा सामना करण्यासाठी विशेष पद्धतीने लायटिंग पोल डिझाईन करण्यात आले आहे. विद्युत संकटकाळात कुठल्याही संभाव्य नुकसानीपासून वाचण्यासाठी लायटिंग प्रोटेक्शन सिस्टिम लावण्यात आली आहे.

शिवडीवरून जाताना या भागात नॉईज बॅरियर बसवण्यात आला आहे. कारण या पूलाचा भाग फ्लेमिंगो संरक्षण क्षेत्र आणि भाभा अणुसंशाधन केंद्र यातून पुढे जात आहे. हा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी तीन स्थापत्य कंत्राटदार, एक इंटेलिजन्ट ट्रान्सपोर्ट सिस्टिम कंत्राटदार, विविध १० देशांतील विषयतज्ज्ञांनी आपले योगदान दिले असून १५०० हून अधिक अभियंते, तर सुमारे १६५०० कुशल मजुरांनी ३ शिफ्टमध्ये अहोरात्र काम केले आहे

अटल सेतू हा मुख्यत: मुंबई - पुणे एक्सप्रेस वेला जोडण्यासाठी डिझाईन करण्यात आले आहे. ज्यामुळे राज्यातील दोन प्रमुख शहरांना जोडण्याचे काम करेल. ज्यातून दळववळण करणे सोपे होईल. समुद्र तळापासून १५ मीटर उंचीवर पूलाचे बांधकाम करणे हे सर्वात मोठे आव्हानात्मक काम होते.

मुंबई शहराच्या चौफेर विस्तारासाठी साहाय्यभूत ठरणारा हा सेतू ‘गेमचेंजर’ ठरणारा असेल. अटल सेतूच्या एकेरी प्रवासासाठी २५० रुपये टोल भरावा लागेल. जर तुम्ही राउंड ट्रिप करत असाल तर तुम्हाला ३७५ रुपये मोजावे लागतील.