वर्षभरात राज्यात ५३ हजार ७३० रक्तदाते वाढले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 03:11 AM2019-06-14T03:11:25+5:302019-06-14T03:11:55+5:30

राज्य रक्त संक्रमण परिषदेची माहिती; मागील दहा वर्षांहून अधिक काळ रक्तसंकलनात महाराष्ट्र आघाडीवर

 In the year 53 thousand 730 blood donation increased in the state | वर्षभरात राज्यात ५३ हजार ७३० रक्तदाते वाढले

वर्षभरात राज्यात ५३ हजार ७३० रक्तदाते वाढले

Next

स्नेहा मोरे 

मुंबई : रक्तदानाविषयी सर्व स्तरांवर होणाऱ्या जनजागृतीमुळे गेल्या वर्षभरात राज्यात ५३ हजार ७३० रक्तदाते वाढल्याची माहिती राज्य रक्त संक्रमण परिषदेने दिली आहे. जागतिक रक्तदाता दिनाच्या निमित्ताने राज्याच्या आरोग्यसेवा क्षेत्रासाठी ही सकारात्मक बाब आहे. गेली १० हून अधिक वर्षे महाराष्ट्र रक्तसंकलनात आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे.

राज्यात २०१७ साली १६ लाख २ हजार ६९० रक्तदाते होते, तर २०१८ साली हे प्रमाण १६ लाख ५६ हजार ४२० इतके झाले आहे. वर्षभरात ५३ हजार ७३० रक्तदात्यांची वाढ झाली आहे. महाराष्ट्र रक्तदानात देशात प्रथम क्रमांकावर राहिले असले तरी दरवर्षी आपलेच विक्रम मोडण्याचे काम महाराष्ट्रात होताना दिसते. २०१४ साली राज्यात १५ लाख ६२ हजार रक्तदात्यांनी रक्तदान केले होते. त्यातील ९५.६९ टक्के रक्तदान हे ऐच्छिक होते. २०१५ साली १५ लाख ६६ हजार पिशव्या रक्तदान झाले असून ९६.८२ टक्के लोकांनी स्वेच्छेने रक्तदान केले. २०१६ मध्ये १६ लाख १७ हजार, तर २०१७ साली तब्बल १६ लाख २० हजार लोकांनी रक्तदान केले. यात अनुक्रमे ९७.०६ टक्के व ९७.५४ टक्के रक्तदान हे ऐच्छिक होते.
राज्यातील ३५ जिल्ह्यांमध्ये ३३२ रक्तपेढ्यांच्या माध्यमातून रक्तसंकलन व साठवणूक केली जाते. हे रक्त अशक्त माता, बालके, अपघातग्रस्त, कॅन्सररुग्ण, थॅलेसेमिया, हिमोफिलिया, सिकलसेल, रक्तासंबंधी अन्य रुग्णांसाठी वापरले जाते. राज्यात ३३२ परवानाधारक रक्तपेढ्या कार्यरत असून, जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषाप्रमाणे लोकसंख्येच्या एक टक्का रक्तसंकलन असणे आवश्यक आहे.

कोण करू शकते रक्तदान?
प्रत्येकातील केवळ ३५० मिलि रक्त एक ते तीन रुग्णांना जीवनदान देऊ शकते. १८ ते ६० वर्षांमधील कोणतीही स्वस्थ्य व्यक्ती रक्तदान करू शकते. रक्तदान करणाºया व्यक्तीचे वजन हे ४५ किलोपेक्षा जास्त असावे. हिमोग्लोबिनचे प्रमाण हे १२.५ इतके असावे. रक्तदाब असणाऱ्यांनी रक्तदान करताना त्याची चाचणी करून पाहावी.

रक्तदानासाठी पुढाकार घेणे गरजेचे
यंदा ‘सर्वांसाठी सुरक्षित रक्त’ ही या दिनाची संकल्पना असून त्या दृष्टिकोनातून विविध स्तरांवर जनजागृतीचे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. दात्याच्या आरोग्यासाठी रक्तदान उपयुक्त असते हा प्रसार करण्यावर परिषद अधिकाधिक भर देत आहे. दिवसेंदिवस रक्ताची मागणी वाढत आहे. मुबलक रक्तसाठा रक्तपेढीत तेव्हाच उपलब्ध होऊ शकतो जेव्हा रक्तदाते स्वयंस्फूर्तीने रक्तदानासाठी पुढाकार घेतील. रस्ते अपघात, रक्ताचे विकार, प्रसूती, नैसर्गिक व मानवी आपत्ती अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज असते. त्यामुळे अधिकाधिक रक्तदात्यांनी रक्तदानासाठी पुढाकार घ्यायला हवा.
- डॉ. अरुण थोरात, संचालक, राज्य रक्त संक्रमण परिषद

मुंबईकरांचीही आघाडी
२०१८ साली मुंबई शहर उपनगरात ३ हजार ४०१ रक्तदानाची शिबिरे झाली. त्यात २ लाख ९८ हजार ३९८ दात्यांनी रक्तदान केले. तर २०१७ साली २ हजार १२१ शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते, त्यात २ लाख ९५ हजार ७५९ रक्तदात्यांची नोंद झाली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत २ हजार ६३९ रक्तदाते वाढल्याची माहिती राज्य रक्त संक्रमण परिषदेने दिली.
 

Web Title:  In the year 53 thousand 730 blood donation increased in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.