मालाड मधील बहुरंगी लोकवस्तीचा कौल कुणाला?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 04:48 AM2019-03-18T04:48:43+5:302019-03-18T04:49:04+5:30

भाजपाचा बालेकिल्ला अशी उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाची ओळख. २०१४ च्या निवडणुकीत या मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रात भाजपा उमेदवाराने सरासरी साठ ते सत्तर हजारांचे मतााधिक्य मिळविले होते.

 Who is the name of the multi-colored population in Malad? | मालाड मधील बहुरंगी लोकवस्तीचा कौल कुणाला?

मालाड मधील बहुरंगी लोकवस्तीचा कौल कुणाला?

Next

- गौरीशंकर घाळे

भाजपाचा बालेकिल्ला अशी उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाची ओळख. २०१४ च्या निवडणुकीत या मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रात भाजपा उमेदवाराने सरासरी साठ ते सत्तर हजारांचे मतााधिक्य मिळविले होते. त्याला एकमेव अपावद ठरला तो म्हणजे मालाड पश्चिमेचा. येथील मताधिक्य केवळ वीस हजारपर्यंत मर्यादि करतानाच काँग्रेस उमेदवाराच्या वाट्याला पन्नास हजाराहून अधिक मते आली. राजकीय अवकाश भाजपा आणि शिवसेनेने व्यापला असला तरी मालाडच्या रूपात काँग्रेस तग धरून आहे. २०१४ च्या विधानसभा लढतीत मुंबईतील ३६ पैकी काँग्रेसला केवळ पाच जागा राखता आल्या. त्यातील एक मालाड पश्चिमेची. आमदार अस्लम शेख या भागात काँग्रेसचा किल्ला लढवीत आहेत.
एक पट्टा पॉश लोकवस्तीचा आणि बहुतांश भाग दाटीवाटीने वसलेल्या झोपड्या, कोळीवाडे, गावठाण अशी बहुढंगी आणि बहुरंगी लोकवस्ती येथे वसली आहे. काँग्रेसची परंपरागत मानला जाणारी मुस्लिम, ख्रिश्चन वस्ती मोठ्या प्रमाणावर आहेत. शिवाय, दुसऱ्यांदा आमदारकी करणाऱ्या अस्लम शेख यांनी गुजरातीबहुल भागातही जाणीवपूर्वक संपर्क ठेवला आहे.
अंतर्गत गटबाजी ही मुंबई काँग्रेसमधील लपून राहिलेली बाब नाही. दिवंगत मुरली देवरा, गुरूदास कामत यांच्या काळातही अंतर्गत कुरबुरी होत्याच.
पण, निरूपम यांच्या चार वर्षांच्या अध्यक्षपदाच्या काळात ही गटबाजी उच्चरवात ऐकू आली. या काळात निरूपम यांच्या पाठीशी ठाम उभे राहिलेले एकमेव आमदार म्हणून असतील शेख यांचे नाव घेता येईल. अंतर्गत कुरघोडीचा फारसा त्रास त्यांना सोसावा लागला नाही.
उत्तर मुंबईत मंत्री विनोद तावडे, संघटनेत महत्वाची भूमिका बजावणारे आमदार अतुल भातखळकर, योगेश सागर स्वपक्षातील असले तरी त्यांच्या मतदारसंघातील कामांना स्वाभाविक मयार्दा येतात. संसदीय राजकारणात अशी कामेसुद्धा मतदारसंघातील शिरकाव, घुसखोरी मानली जाते. त्या तुलनेत काँग्रेसच्या ताब्यातील मालाड पश्चिमेत ही अडचण नव्हती.

राजकीय घडामोडी

मध्यंतरी मनसेने फेरीवाल्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली.
ठाणे कल्याण परिसरात काही फेरीवाल्यांच्या गाड्या फोडण्यात आल्या.
मालाडमध्ये मनसे पदाधिका?्यास मारहाण झाली. मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरूपम यांनी फेरीवाल्यांचा मोर्चा काढत आक्रमक भाषणही केले.
काँग्रेस-भाजप ही येथील मोठी टक्कर आहे. कारण दहा वर्षांत प्रत्येकी पाच वर्ष दोघांच्या वाटयाला आली असून, मतांचा कल पक्षीय बलाबल ठरवेल.
एकेकाळी सर्व समाजघटकांना सामावून घेणारी काँग्रेस केवळ फेरीवाले आणि उत्तर भारतीयांची राहणार का, असा सवालही केला गेला.

दृष्टिक्षेपात राजकारण

अस्लम शेख सलग दुसऱ्यांदा आमदार झाले. युतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ भाजपाकडे होता. २००९ साली युती एकत्र लढली तेंव्हा काँग्रेसच्या अस्लम शेख यांच्याकडे २७ हजारचे मताधिक्य होते. २०१४ साली मात्र हे अंतर अवघ्या दोन हजारांवर आले.
अवघ्या दोन हजारांनी हुकलेली संधी साधण्यासाठी भाजपाने कंबर कसली आहे. अंतर्गत राजकारण आणि त्यातुन झालेल्या गलिच्छ आरोपांचे एक पर्व संघटनेने यशस्वीपणे हाताळले. मात्र, अद्याप कार्यकर्त्यांचा चमू हवा तितका एकजिनसी झालेला नाही. येत्या काळात या आघाडीवर प्रयत्न झाले तर बदल शक्य आहे.
एकेकाळी शिवसेनेची स्वत:ची शक्ति होती. मधुकर राऊत, परशुराम पाटील, अशोक पटेल अशी शिवसेनेत समाजात स्थान असलेल्या नेत्यांची साखळी होती. सध्या आंबोजवाडी वगैरे परिसर सोडला तर अन्यत्र संघटन पुनरूज्जीवित करण्यासाठी शिवसेनेला विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत.
खासदार निधीचा ओघ काँग्रेसच्या मतदारसंघात वळविल्याबद्दल स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांनी अनेकदा नाराजीही व्यक्त केली.

Web Title:  Who is the name of the multi-colored population in Malad?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.