ताण कमी करण्यासाठी जलवाहतूक आवश्यक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 03:52 AM2019-02-07T03:52:41+5:302019-02-07T03:52:57+5:30

मुंबई महानगर क्षेत्रातील सार्वजनिक वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी पर्यायी वाहतुकीचा शोध सुरू झाला. त्यातून जलवाहतुकीला गती मिळाली. जलवाहतुकीच्या विविध प्रकल्पांचा अभ्यास सध्या सुरू आहे. मुंबई, ठाण्यासह कोकणातील जलवाहतुकीला गती देण्याचे आश्वासन देताना मुख्यमंत्र्यांनी मुंबई महानगर क्षेत्रातील जलवाहतूक आराखड्यास मंजुरी देण्याची घोषणा केली.

Navigation needed to reduce the stress | ताण कमी करण्यासाठी जलवाहतूक आवश्यक

ताण कमी करण्यासाठी जलवाहतूक आवश्यक

Next

मुंबई महानगर क्षेत्रातील सार्वजनिक वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी पर्यायी वाहतुकीचा शोध सुरू झाला. त्यातून जलवाहतुकीला गती मिळाली. जलवाहतुकीच्या विविध प्रकल्पांचा अभ्यास सध्या सुरू आहे. मुंबई, ठाण्यासह कोकणातील जलवाहतुकीला गती देण्याचे आश्वासन देताना मुख्यमंत्र्यांनी मुंबई महानगर क्षेत्रातील जलवाहतूक आराखड्यास मंजुरी देण्याची घोषणा केली. जलवाहतुकीबाबत आजवर अनेक घोषणा झाल्या. पण ही सेवा प्रत्यक्षात आली नाही. जलवाहतुकीमुळे कोकणात जाण्यास सोपा आणि जलद पर्याय उपलब्ध होणार आहे. तसेच सध्याच्या वाहतूक व्यवस्थेवरील ताण विभागला जाणार आहे़ त्यामुळे यंदा तरी जलवाहतूक प्रत्यक्षात येणे गरजेचे आहे, असे मत ‘लोकमत’च्या वाचकांनी ‘प्रवासी कट्ट्या‘च्या व्यासपीठावर व्यक्त केले. त्यातील निवडक प्रतिक्रियांचा आढावा.

जलवाहतुकीबाबत प्रबळ इच्छाशक्ती हवी
राज्याच्या ठाणे, मुंबई, रायगडपासून ते गोव्यापर्यंत किनारपट्टीवर फार वर्षांपूर्वी जलवाहतूक सुरू होणे आवश्यक होते. मात्र, सरकारच्या नाकर्तेपणामुळे हे काम रखडले आहे. सरकारकडून आश्वासने दाखविण्यात येत आहेत. जलवाहतूक सुरू होण्यासाठी सरकारकडून खूप अपेक्षा ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, या अपेक्षा कधी पूर्ण होतील, असा प्रश्न पडला आहे. पण सरकारने प्रबळ इच्छाशक्ती दाखवल्यास ही सेवा सुरू होईल. जलवाहतूक सुरू झाल्यास प्रवाशांना जादा वाहतुकीच्या सेवा मिळतील. जलवाहतुकीचे फायदे-तोटे असणे हे स्वाभाविक आहे. कितीही चांगल्या सोयी पुरविल्या तरी प्रवाशांनी शिस्तीने प्रवास करणे आवश्यक आहे. त्यामुळे जलवाहतुकीची दिवास्वप्नांची पूर्ती झाली, तरी भान राखून केलेला प्रवास नेहमीच सुखद असतो हे सर्वांनी ध्यानी ठेवावे लागेल.
- स्नेहा राज, गोरेगाव


कोकणापर्यंतच्या प्रवाशांना उत्तम पर्याय
विद्यमान सरकारची मुदत संपण्याअगोदर जलवाहतुकीचा आराखडा मंजूर करणे आवश्यक आहे. सध्याच्या सरकारला मतांसाठी का होईना पण काही तरी करून दाखवायचे आहे. त्यामुळे अनेक योजना प्रगतिपथावर आहेत. जलवाहतुकीच्या प्रकल्पाला सर्व मंजुरी मिळाल्यानंतर कोकणापर्यंतच्या प्रवाशांना उत्तम पर्याय उपलब्ध होईल. मात्र, पावसाळ्यातील समुद्राच्या रौद्ररूपामुळे जलवाहतूक बंद राहणार आहे. मुंबई शहरालगतच्या समुद्रात प्रवाशांच्या चढ-उतारासाठी धक्के बांधण्यापूर्वी स्थानिक कोळीवाड्यातील जनतेला विश्वासात घेऊन काही ठिकाणी त्यांच्या पुनर्वसनाची किंमत मोजावी लागेल. जलवाहतूक हा व्यवसाय झाला की, त्यातील स्पर्धेमुळे सेवेच्या दर्जात सुधारणा होतील.
- राजन पांजरी, जोगेश्वरी

कोकणवासीयांना ‘अच्छे दिन’ येतील
कोकणात पुन्हा नव्याने सुरू होणाऱ्या जलवाहतूक हा तुलनेने स्वस्त आणि पर्यावरणपूरक मार्ग होऊ शकतो. त्यामुळे किनारपट्टीवरील भागाचा विकास होईल शिवाय वेळ व इंधनाची बचत होईल. नव्याने सुरू होणाºया जलवाहतुकीचा निर्णय योग्य आहे. आयात-निर्यातीची वाहतूक ९० टक्के जहाजातून होते. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आणि विकासासाठी ही योजना लाभकारी होऊ शकते. जलवाहतुकीमुळे रस्त्यावरील ताण वाहतूककोंडी विभागली जाऊन लोकांना चांगली सेवा मिळेल यामुळे कोकणवासीयांना ‘अच्छे दिन’ येतील.
- कमलाकर जाधव, बोरीवली

भरती-ओहोटीच्या अभ्यासानंतर धक्के बांधावे
जलवाहतूक हा प्रकल्प खूप चांगला आहे. यासाठी सागरातील वाटेत अडचणीचे ठरणारे खडक व भरती-ओहोटी याचा अभ्यास करून फलाट-धक्के बांधणे आवश्यक आहे. यासाठी जर सरकारकडे पैसा उपलब्ध नसेल. बांधा-वापरा-हस्तांतरित करा या तत्त्वावर कामे केली पाहिजेत. - गणेश पाटील, ठाणे

जेट्टीपासून बस स्टॅण्डपर्यंत बससेवा हवी!
मुंबई महानगर क्षेत्रात दिवसेंदिवस वाढणाºया लोकवस्तीमुळे रेल्वे, बस, टॅक्सी, रिक्षा व खासगी वाहने यांचा वाहतुकीवर प्रचंड ताण आहे. यासह या वाहतुकीमुळे विविध प्रकारचे प्रदूषण होऊन अनेक आजार पसरत आहेत. वाहतुकीवरील ताण दूर करण्यासाठी जलवाहतूक उत्तम सुविधा आहे. बाहेर पडल्यावर वाहतूककोंडीला सामोरे जावे लागते. त्यामुळे ठाणे, मुंबई ते कोकणपट्ट्यापर्यंत जलवाहतूक झाल्यास उत्तम सुविधा होईल. मात्र, सरकारकडून घोषणा होऊनही ही सेवा सुरू झाली नाही. सरकारचे दुर्लक्ष व नियोजनाचा अभाव हेच यामागचे कारण म्हणता येईल. जलवाहतूक सुरू झाल्यास प्रवाशांना लाइफ जॅकेटसह सुरक्षेच्या सुविधा देण्यात आल्या पाहिजेत. बोटीच्या वेळेत जेट्टी ते नजीकच्या बस स्टॅण्डपर्यंत बसेसची सोय व्हायला हवी, जेणेकरून प्रवाशांना पुढील प्रवास रखडणार नाही. जलवाहतुकीमुळे उद्योगधंदा वाढीस चालना मिळेल व स्थानिकांना रोजगारही उपलब्ध होतील.
- मुरलीधर धंबा, डोंबिवली

जलवाहतुकीमुळे स्थानिक मच्छीमारांना आधार मिळेल
जलवाहतूक सेवा सुरू झाल्यास सर्वांना याचा फायदा होणार आहे. जलवाहतुकीमुळे स्थानिक मच्छीमारांना रोजगार मिळेल. त्यामुळे मच्छीमारांच्या उत्पन्नाला आधार मिळेल. जलवाहतुकीचा अतिरेक करता कामा नये. कारण त्यामुळे पर्यावरणाचे नुकसान होईल.
- प्रज्वली नाईक,
पनवेल

इतर वाहतूक सेवांवरील ताण कमी होईल
रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवरील वाढत जाणारा ताण कमी करण्यासाठी जलवाहतुकीचा अवलंब करणे ही आता काळाची गरज बनली आहे. जलवाहतुकीवर गांभीर्याने विचार करण्यात आला नाही. नदी-जोड प्रकल्प राबवून जलवाहतूक करायला हवी. मुंबईचा तिन्ही बाजूकडील परिसर समुद्राने वेढलेला आहे. राज्याला जवळपास ७९० किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे. बºयाच वर्षांपूर्वी मुंबई - गोवा जलवाहतूक सुरू होती, मात्र कालांतराने ती बंद पडली. आता गेल्या वर्षांपासून परत एकदा मुंबई - गोवा वाहतूक सुरू झाली आहे. मुंबई, नवी मुंबई आणि आसपासच्या थेट वसई, डहाणू, कल्याण परिसरातील खाडी व नद्यांना पुनर्जीवित करून जलवाहतूक सुरू करायला हवी. त्यानिमित्ताने नद्या व खाडी नष्ट करण्याला देखील आळा बसेल आणि पर्यावरणाचा ºहास रोखण्यासाठी मदत होईल.
- अनंत बोरसे, शहापूर

नोकरीच्या मुबलक संधी उपलब्ध होतील
मुंबईत रेल्वे, बस, टॅक्सी, मोनो, मेट्रो आणि विमान सेवा उपलब्ध आहे. मात्र, जलवाहतूक सेवा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध नाही. जलवाहतूक सेवा सुरू झाल्यास इतर सेवावरील ताण कमी होईल. कल्याणच्या खाडीमधून जलवाहतूक सेवा सुरू झाल्यास रेल्वेला पर्यायी वाहतूक उपलब्ध होईल. कल्याण ते मुंबई जलमार्गे जोडता येईल. बाहेरील देशात जलवाहतूक सेवा उत्तमप्रकारे सुरू आहे. त्यामुळे आपल्या देशात ही सेवा सुरू होणे गरजेचे आहे. यामुळे रोजगारात वाढ निर्माण झाल्याने नोकरीच्या मुबलक संधी उपलब्ध होतील.
- प्रभाकर थोरात, शहापूर

सरकारच्या उदासीन
धोरणामुळे प्रश्न कायम

अनेक वर्षांपासून जलवाहतूक सेवा सुरू करण्यात येण्याची घोषणा केली जात आहे. मात्र, अजूनपर्यंत जलवाहतूक सेवा सुरू झाली नाही. कल्याण खाडीतून, ठाणे खाडीतून जलवाहतूक उत्तम प्रकारे होऊ शकते. मात्र, सरकार या बाबतीत उदासीन असण्याने हा प्रश्न सुटत नाही.
- सन्नी रोकडे, शहाड

संकलन - कुलदीप घायवट

Web Title: Navigation needed to reduce the stress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई