मुंबईकरांचा प्रवास चार वर्षांत होणार सुसाट, कोस्टल रोडला अखेर हिरवा कंदील

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2018 06:54 AM2018-09-26T06:54:41+5:302018-09-26T06:55:34+5:30

देशातील सर्वात मोठा प्रकल्प ठरलेल्या मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाला (कोस्टल रोड) अखेर स्थायी समितीची मंजुरी मिळाली. त्यानुसार, प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते कांदिवलीपर्यंत कोस्टल रोड तयार होऊन मुंबईकरांचा प्रवास चार वर्षांत सुसाट होणार आहे.

Mumbai's journey to be faster in four years, green signal to coastal road | मुंबईकरांचा प्रवास चार वर्षांत होणार सुसाट, कोस्टल रोडला अखेर हिरवा कंदील

मुंबईकरांचा प्रवास चार वर्षांत होणार सुसाट, कोस्टल रोडला अखेर हिरवा कंदील

Next

मुंबई  - देशातील सर्वात मोठा प्रकल्प ठरलेल्या मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाला (कोस्टल रोड) अखेर स्थायी समितीची मंजुरी मिळाली. त्यानुसार, प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते कांदिवलीपर्यंत कोस्टल रोड तयार होऊन मुंबईकरांचा प्रवास चार वर्षांत सुसाट होणार आहे. या प्रकल्पांतर्गत प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे-वरळी सागरी सेतूच्या वरळी टोकापर्यंत ९.९८ किलोमीटर लांबीच्या या कोस्टल रोडचे काम महापालिकेमार्फत होणार आहे. मात्र, आठ हजार कोटी रुपये मूळ किंमत असलेल्या या प्रकल्पाचा खर्च विविध करांमुळे तब्बल १२ हजार ७२१ कोटींवर पोहोचला आहे.
कोस्टल रोडची एकूण लांबी ९.९८ किमी एवढी आहे, तर आंतरबदलांसह ही लांबी सुमारे २४ किमी एवढी असणार आहे. या रस्त्यादरम्यान दोन बोगदे असून, त्यातून सुमारे सहा किमी लांबीचा रस्ता जाणार आहे.
या रस्त्याचे बांधकाम तीन भागांत विभागण्यात आले असून, याचे काम स्वतंत्रपणे एकाच वेळी करण्यात येणार आहे. यापैकी पहिला भाग प्रियदर्शनी पार्क ते बडोदा पॅलेस, दुसरा भाग हा बडोदा पॅलेस ते वांद्रे वरळी सागरी सेतूच्या वरळी बाजूपर्यंत, तर तिसरा भाग प्रिन्सेस स्ट्रीट ते प्रियदर्शनी पार्क असा असेल. महापालिकेमार्फत होणाऱ्या कामाचे कंत्राट लार्सन अँड टुब्रोला (एल अँड टी) आणि एचसीसी व एचडीसी या कंपन्यांना मिळणार आहे.

वेळेसह इंधनाची बचत

शिवसेनेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोड २०१३ पासून चर्चेत आला. मात्र, समुद्रात भराव टाकून हा मार्ग तयार होत असल्याने, कोळी समाज व पर्यावरणप्रेमींकडून या प्रकल्पाला विरोध होत होता. अखेर अनेक बदल व केंद्र, तसेच राज्य सरकारच्या १८ प्रकारची ना-हरकत प्रमाणपत्रे मिळविण्यात महापालिकेला यश आले आहे.
या प्रकल्पामुळे दक्षिण मुंबईतून पश्चिम उपनगरापर्यंतच्या मुंबईकरांच्या प्रवासात सुमारे ७० टक्के वेळेची व ३४ टक्के इंधनाची बचत होणार आहे. त्याचबरोबर, ध्वनी व वायुप्रदूषण कमी होण्यास मदत होईल, असा पालिकेचा दावा आहे.

प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे-वरळी सागरी सेतूच्या वरळी टोकापर्यंत ९.९८ किलोमीटर लांब कोस्टल रोडचे काम महापालिका करणार.

बडोदा पॅलेस ते वांद्रे वरळी सागरी सेतूचे दक्षिणेकडील टोक

प्रत्यक्ष कामाला आॅक्टोबरचा मुहूर्त
कोस्टल रोडच्या कामाला आॅक्टोबर महिन्यापासून सुरुवात होणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रकल्पाच्या खर्चात आता आणखी वाढ होणार नाही. कारण वेळापत्रकानुसार काम करण्याचे हमीपत्रच महापालिकेने लिहून
घेतले आहे. चार वर्षांत हे काम पूर्ण होणार असून,
कामास विलंब झाल्यास कंत्राटदारास
दंड ठोठाविण्यात येणार आहे.

कोस्टल रोडचा खर्च १२ हजार कोटी


मुंबई : कोस्टल रोड या प्रकल्पाचा मूळ खर्च आठ हजार कोटी रुपये असताना त्यात चार हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे विरोधी पक्षाने आक्षेप घेत प्रस्ताव रोखून धरला होता. मात्र आयुक्त अजय मेहता यांनी याबाबत सादरीकरण करीत विरोधकांच्या शंकांचे निरसन केले.
विविध कर व इतर बंधनकारक शुल्कांपोटी चार हजार ३०२ कोटी रुपये वाढले. यामध्ये आठ टक्के पाणीपट्टी, चार टक्के मलनि:सारण कर, १० टक्के महापालिकेचे पर्यवेक्षकीय शुल्क, एक टक्का उपयोगिता संबंधित खर्च, दोन टक्के वन व पर्यावरण मंत्रालयाचे संबंधित शुल्क, १० कोटी फुलपाखरू उद्यानासाठी राखून ठेवण्यात आले आहे. यापैकी बहुतेक कर, शुल्क हे महापालिकेकडेच जमा होणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
आकस्मिक निधीसाठी विशेष तरतूद असून, अशा प्रकारचा हा देशातील पहिलाच प्रकल्प आहे. यामध्ये चार टक्के आकस्मिक निधी तरतूद आहे. २० टक्के रकमेची तरतूद ही किंमत आधारित आकस्मिक निधीसाठी आहे. आठ हजार ४१९ कोटींपैकी सुमारे २० टक्के म्हणजेच एक हजार ७०० कोटी रुपये हे शासकीय करांसाठी आहेत. ९० हेक्टर मोकळे होणार असून, प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे वरळी सी लिंक-वरळी बाजूच्या बांधकामाअंतर्गत ९० हेक्टर एवढे भराव क्षेत्र शहरासाठी उपलब्ध होईल. या रस्त्यावर ये-जा करण्यासाठी आठ मार्गिका आहेत. यापैकी प्रत्येक बाजूला एक याप्रमाणे दोन मार्गिका या रुग्णवाहिकेसाठी व बस वाहतुकीसाठी आहेत. रस्त्यावर चार आंतरबदल असतील. प्रस्तावित आंतरबदलांची लांबी १४.०२ किमी आहे. रस्ता टोलमुक्त असेल. रस्त्याजवळ सायकल ट्रॅक, सार्वजनिक उद्यान, ६.४५ किमी लांबीचा व २० मीटर रुंदीचा सागरी किनारा पदपथ, जॉगिंग ट्रॅक, खुले प्रेक्षागृह प्रस्तावित आहे. रस्त्याच्या समुद्राकडलील बाजूला तटरक्षक भिंत बांधण्यात येणार आहे. भिंतीची लांबी ६.४४ किमी एवढी असेल. यामुळे सागरी किनाºयाची धूप होण्यापासून संरक्षण होण्यासह वादळी लाटा व पुरापासूनही संरक्षण होण्यास मदत होणार आहे.

तीन वाहनतळ, दोन जेट्टी बांधणार
त्याचबरोबर, एक हजार ६२५ वाहन क्षमता असणारी तीन वाहनतळ हे अमरसन्स, हाजिअली व वरळी या ठिकाणी उभारण्यात येतील. अमरसन्स व वरळी या ठिकाणी प्रत्येकी एक याप्रमाणे दोन ‘जेट्टी’ बांधण्यात येतील.

Web Title: Mumbai's journey to be faster in four years, green signal to coastal road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.