विशेष विवाह कायद्यान्वये विवाह करणाऱ्यांत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 04:23 AM2018-08-13T04:23:09+5:302018-08-13T04:23:31+5:30

आंतरजातीय विवाह करताना अनेकदा कुटुंबीयांचा मोठा विरोध पत्करावा लागत असल्याने विवाह करण्यासाठी विशेष विवाह कायद्याचा लाभ घेतला जात होता.

Marriage Increase According to Special Marriage Act | विशेष विवाह कायद्यान्वये विवाह करणाऱ्यांत वाढ

विशेष विवाह कायद्यान्वये विवाह करणाऱ्यांत वाढ

googlenewsNext

- खलील गिरकर
मुंबई : आंतरजातीय विवाह करताना अनेकदा कुटुंबीयांचा मोठा विरोध पत्करावा लागत असल्याने विवाह करण्यासाठी विशेष विवाह कायद्याचा लाभ घेतला जात होता. मात्र, गेल्या काही काळापासून हा कल बदलत असून कुटुंबीयांची सहमती असतानाही या कायद्यान्वये विवाह करणाºयांच्या प्रमाणात वाढ होत आहे. सध्या या कायद्यान्वये विवाह करणाºयांमध्ये तब्बल ८० टक्के प्रमाण कुटुंबीयांच्या सहमतीने विवाह करणाºयांचे आहे.
मुंबई शहर विवाह नोंदणी व विवाह निबंधक कार्यालयात विशेष विवाह कायद्यान्वये १ जानेवारी २०१८ ते जुलै २०१८ या कालावधीत ५५५ विवाह झाले आहेत. जानेवारी २०१७ ते डिसेंबर २०१७ या कालावधीत ९५९ विवाह झाले. ज्यांचे विवाह पूर्वीच झाले आहेत, मात्र त्यांची नोंदणी झालेली नव्हती अशा ६१९ प्रकरणांची नोंद या वर्षात करण्यात आली आहे. १५ मे १९९९ पासून विवाह नोंदणीचे अधिकार महापालिकांना देण्यात आले आहेत. त्यामुळे त्यापूर्वी झालेल्या विवाहांची नोंदणी विवाह निबंधक कार्यालयात केली जाते. राज्याबाहेर किंवा देशाबाहेर करण्यात आलेल्या विवाहाची नोंदणीदेखील विवाह नोंदणी व निबंधक कार्यालयात केली जाते.
आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाहांना अनेकदा कुटुंबीयांचा विरोध असल्याने ज्यांना विवाह करायचा असेल त्यांना विशेष विवाह कायद्यान्वये विवाह करणे भाग पडत होते. मात्र आता कुटुंबीयांनी जुळवलेला विवाह असला तरी या कायद्यान्वये विवाह करण्याचा कल वाढीस लागला आहे. या कायद्यान्वये विवाह करण्यापूर्वी एक महिन्याची नोटीस द्यावी लागते व त्यासाठी केवळ १५० रुपयांचा खर्च येतो. त्यानंतर तीन महिन्यांच्या कालावधीत विवाह करणे आवश्यक असते. त्या वेळी १५० रुपये नोंदणीसाठी आकारले जातात. अवघ्या ३०० रुपयांमध्ये विवाह होतो. सध्या या कार्यालयात आॅनलाइन सेवा पुरवण्यासंदर्भात कार्यवाही सुरू आहे. लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे.

समाजामध्ये स्वागतार्ह बदल होत आहे. पूर्वी आंतरजातीय-धर्मीय विवाह करणाºयांना या कायद्याचा मोठा लाभ होत होता. त्यामध्ये अनेकदा कुटुंबीयांचा विरोध होत असे. मात्र, आता कुटुंबीयांच्या सहमतीने होणारे विवाहदेखील विशेष विवाह कायद्यान्वये करण्याचा कल वाढू लागला आहे.
- मीना अंबिलपुरे,
विवाह अधिकारी, मुंबई शहर

उपनगरात वर्षभरात साडेतीन हजार विवाह

मुंबई उपनगर विवाह नोंदणी कार्यालयात १ जानेवारी २०१८ ते ३१ जुलै २०१८ या कालावधीत विशेष विवाह कायद्यान्वये २ हजार १२० विवाह झाले. तर पूर्वी लग्न झालेल्या मात्र नोंदणी नसलेली ५६० लग्ने नोंदवण्यात आली. १ जानेवारी २०१७ ते ३१ डिसेंबर २०१७ या वर्षभराच्या कालावधीमध्ये विशेष विवाह कायद्यान्वये ३ हजार ४३५ विवाह झाले, तर पूर्वी विवाह होऊनदेखील नोंदणी न केलेले ८२४ विवाह नोंदवण्यात आले. या कार्यालयात नोंदणी प्रक्रियेचे पूर्ण संगणकीकरण झाले आहे. या ठिकाणी विवाह अधिकारी असलेल्या पी.के. देवकर यांनी त्यांच्या सव्वातीन वर्षांच्या कारकिर्दीमध्ये सुमारे १४ हजार विवाहांची नोंदणी केल्याची माहिती दिली. मुंबई उपनगर विवाह कार्यालयातील आॅनलाइन नोंदणी प्रक्रियेला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती देवकर यांनी दिली.

Web Title: Marriage Increase According to Special Marriage Act

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.