अकरावीची प्रवेश क्षमता जाहीर होण्यास पुन्हा लेटमार्क

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2019 06:39 AM2019-06-28T06:39:06+5:302019-06-28T06:39:22+5:30

यंदाची अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली, बायफोकलची यादीही लागली, मात्र अकरावीची एकूण प्रवेश क्षमता जाहीर होण्यास मुहूर्त मिळत नसल्याचे चित्र आहे.

Lettermark again to announce eleventh entry capability | अकरावीची प्रवेश क्षमता जाहीर होण्यास पुन्हा लेटमार्क

अकरावीची प्रवेश क्षमता जाहीर होण्यास पुन्हा लेटमार्क

Next

मुंबई  -  यंदाची अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली, बायफोकलची यादीही लागली, मात्र अकरावीची एकूण प्रवेश क्षमता जाहीर होण्यास मुहूर्त मिळत नसल्याचे चित्र आहे.

इतके दिवस विविध प्रकारच्या आरक्षणात मराठा आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील आरक्षणे वाढल्याने एकूण जागांच्या तिढ्याचे गणित सुटत नव्हते. त्यामुळे अकरावी प्रवेशाच्या एकूण जागांची क्षमता निश्चित होत नव्हती. त्यामुळे ती जाहीरही करण्यात आली नाही. आता मराठा समाजाच्या शैक्षणिक आरक्षणात १६ टक्क्यांवरून १३ टक्के असा बदल झाल्याने जागांची क्षमता पुन्हा बदलण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे अकरावीची एकूण जागांची प्रवेश क्षमता जाहीर होण्यास अजून ५ ते ६ दिवसांचा लेटमार्क लागण्याची माहिती उपसंचालक कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

यंदापासून अकरावीच्या आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेला मराठा आणि सवर्ण आरक्षण लागू करण्यात आले आहे. त्यातच निकाल कमी लागल्यामुळे राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी मुंबई महानगर प्रदेशातील ९८ महाविद्यालयांंमध्ये ६,६२२ जागा वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र यानंतरही खुल्या गटासाठी किती जागा असतील? आरक्षित गटातील विद्यार्थ्यांसाठी किती जागा उपलब्ध करून देण्यात येतील? याचे गणित शिक्षण मंडळाला वेळेत जमविणे अशक्य झाले. यामुळे उपसंचालक कार्यालयाकडून जागांच्या प्रवेश क्षमतेची स्थिती जाहीर करण्यात आली नव्हती. त्यातच गुरुवारी मराठा समाजाच्या आरक्षणावर शिक्कामोर्तब झाले तरी शैक्षणिक आरक्षणाची मर्यादा १६ टक्क्यांवरून १३ टक्के झाल्याने जागांच्या प्रवेश क्षमतेत पुन्हा बदल होण्याची शक्यता असल्याची माहिती शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे यांनी दिली. न्यायालयाच्या निर्णयानंतर त्यासंबंधित आदेश येतील आणि त्यानुसार प्रवेश क्षमतेतही बदल होतील. त्यामुळे जागांची प्रवेश क्षमता जाहीर करण्याच्या प्रक्रियेला ४ ते ५ दिवस लागण्याची शक्यता असल्याची माहिती त्यांनी दिली.

सर्वसाधारण गुणवत्ता यादी १ जुलैला

दरवर्षी कला, वाणिज्य, विज्ञान तसेच द्विलक्षीसाठी किती जागा आहेत, व्यावसायिकसाठी किती जागा आहेत, कोट्यातील जागांची संख्या किती, अशी सर्व माहिती समितीकडून प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याआधी जाहीर केली जाते. तसेच महाविद्यालयांची संख्या किती हेही सांगितले जाते.
मात्र यंदा त्या अद्याप जाहीर न झाल्याने कोणत्या महाविद्यालयांत
कोणत्या आरक्षणासाठी किती जागा उपलब्ध आहेत? विद्यार्थ्यांनी
पसंतीच्या महाविद्यालयांत अर्ज करताना कुठे प्राथमिकता द्यावी? या सर्व प्रश्नांची उत्तरे न मिळाल्याने विद्यार्थी-पालकांना महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम भरताना अडचणी निर्माण होत आहेत. दरम्यान, अकरावी प्रवेशाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी १ जुलै तर पहिली गुणवत्ता यादी ६ जुलै रोजी जाहीर होणार आहे.

Web Title: Lettermark again to announce eleventh entry capability

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई