मुंबईतील रेल्वे प्रकल्पांना मिळणार ३३ हजार कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2019 06:24 AM2019-03-08T06:24:45+5:302019-03-08T06:24:55+5:30

मुंबई नागरी परिवहन प्रकल्प टप्पा ३ अ (एमयूटीपी ३ अ) या प्रकल्पाला अखेर गुरुवारी शेवटच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली आहे.

33,000 crores for Mumbai railway projects | मुंबईतील रेल्वे प्रकल्पांना मिळणार ३३ हजार कोटी

मुंबईतील रेल्वे प्रकल्पांना मिळणार ३३ हजार कोटी

Next

- कुलदीप घायवट 
मुंबई : मुंबई महानगरातील रेल्वे प्रवासाचे चित्र आमूलाग्र बदलून टाकण्याची क्षमता असलेल्या मुंबई नागरी परिवहन प्रकल्प टप्पा ३ अ (एमयूटीपी ३ अ) या प्रकल्पाला अखेर गुरुवारी शेवटच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली आहे. मूळ ५४ हजार ७७७ कोटी रुपयांपैकी ३३ हजार ६९० कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक उपसमितीने मंजुरी दिली आहे.
गोरेगाव-बोरीवली हार्बर मार्गिकेचे विस्तारीकरण, कल्याण-आसनगाव चौथी मार्गिका, कल्याण-बदलापूर तिसरी आणि चौथी मार्गिका आणि १९१ वातानुकूलित लोकल यासह इतर प्रकल्पांना मान्यता मिळाली आहे. पुढील पाच वर्षांत प्रकल्प पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गाहून दररोज ७५ ते ८० लाख प्रवासी प्रवास करतात. मुंबई उपनगरात रेल्वेमार्गाचे एकूण ३८५ किमी जाळे विस्तारलेले आहे. सकाळी आणि सायंकाळच्या वेळी मुंबईकरांची जीवघेण्या प्रवासापासून मुक्तता करण्यासाठी मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड (एमआरव्हीसी)द्वारे मुंबई नागरी परिवहन प्रकल्प (एमयूटीपी) हाती घेतले आहेत. या प्रकल्पांमुळे चौपट क्षमता वाढवून मुंबई, ठाणे, रायगड, पालघर या जिल्ह्यांतील प्रवाशांना विशेष लाभ मिळणार आहे.
एमआरव्हीसीने ५४ हजार ७७७ कोटी रुपयांचे प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी पाठविले होते. या प्रकल्पांना राज्य सरकारची परवानगी देण्यात आली होती. मात्र केंद्रीय मंत्रिमंडळाची परवानगी मिळणे बाकी होते. शेवटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ५४ हजार ७७७ प्रकल्पांपैकी ३३ हजार ६९० कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे. यामधील काही प्रकल्पांवर फेरविचार करण्यात येणार आहे. प्रवाशांची सुरक्षितता आणि सुखद प्रवासासाठी आपोआप उघडणाऱ्या दरवाज्यांसह वातानुकूलित डब्यांचा समावेश, नवीन रेल्वेमार्गाची निर्मिती, सिग्नल यंत्रणा, गर्दीचा ताण विभागण्यासाठी प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे.
एमयुटीपी ३ अ प्रकल्पांना मान्यता मिळाल्यामुळे भविष्यात मुंबईकरांना उत्तम दळणवळणांची सुविधा मिळणार आहे. या प्रकल्पामुळे मुंबईचा वेग वाढणार असल्याचे मुंबई रेल्वे विकास कॉपोर्रेशन लिमिटेड (एमआरव्हीसी) जनसंपर्क अधिकारी अनिलकुमार पतके यांनी सांगितले.
एमयूटीपी ३ अ च्या प्रकल्पांसाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार ५०-५० टक्के खर्च करणार आहे. ३३ हजार ६९० कोटी रुपयांपैकी १६ हजार ८४५ कोटी रुपये केंद्र सरकार आणि १६ हजार ८४५ कोटी रुपये राज्य सरकार देणार आहे.
गोरेगाव ते बोरीवली हार्बर मार्गिका विस्तारीकरण
सीएसएमटी ते गोरेगाव हार्बर मार्गिका प्रवाशांसाठी सुरू आहे. या मार्गिकेचे विस्तारीकरण बोरीवली स्थानकापर्यंत करण्यात येणार आहे.
या प्रकल्पामुळे प्रवाशांना सीएसएमटी ते बोरीवली हार्बर मार्गाने प्रवास करणे शक्य होणार.
यासह पश्चिम मार्गावरील वांद्रे ते बोरीवली लोकलमधील आणि स्थानकांवरील गर्दीचा भार विभाजित होईल.
या प्रकल्पाची एकूण लांबी ७ किमी असून, ८२६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
बोरीवली ते विरार पाचवी आणि सहावी मार्गिका
मुंबई सेंट्रल ते बोरीवली पाचवी मार्गिका आहे, तर सहाव्या मार्गिकेचे काम सुरू आहे.
मात्र बोरीवली ते विरार फक्त चार मार्गिका आहेत.
पाचवी आणि सहावी मार्गिका झाल्यास चर्चगेट ते विरार जलद मार्गाने लोकल सेवा सुरू करणे शक्य आहे.
गर्दीचा ताण विभाजित करण्यासाठी सोईस्कर होणार आहे.
या प्रकल्पासाठी २ हजार १८४ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून एकूण २६ किमी लांबीचा प्रकल्प आहे.
कल्याण - आसनगाव चौथी मार्गिका
मुंबई उपनगरीय आणि उत्तरेकडील मेल, एक्स्प्रेससाठी कल्याण-कसारा मार्ग महत्त्वाचा आहे.
कल्याण-कसारा रेल्वे मार्गावर मिश्र स्वरूपाची वाहतूककोंडी होते. या मार्गिकेहून मेल, एक्स्प्रेस, माल डबे आणि उपनगरीय लोकल सेवा सुरू असते.
चौथी मार्गिका झाल्यास वाहतूककोंडी, लोकल उशिरा येण्याचे प्रमाण कमी होईल.
या मार्गिकेवरील टिटवाळा, आसनगाव आणि कसारा ही प्रमुख स्थानके आहेत. या स्थानकांच्या आजूबाजूकडील परिसरात अनेक विकासकामे, राहणाऱ्यांसाठी घरे उपलब्ध झाली आहेत.
या मार्गिकेवरील तिसºया मार्गिकेचे काम मध्य रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
चौथी मार्गिका एकूण ३२ किमी लांबीची असून १ हजार ७५९ कोटी खर्च अपेक्षित आहे.
कल्याण - बदलापूर तिसरी आणि चौथी मार्गिका
कल्याण - कर्जत रेल्वेमार्ग मुंबई आणि देशाच्या पूर्वेकडील भागासाठी महत्त्वपूर्ण आहे.
कल्याण - कर्जत रेल्वेमार्गावर मिश्र स्वरूपाची वाहतूककोंडी होते. या मार्गिकेहून मेल, एक्स्प्रेस, माल डबे आणि उपनगरीय लोकल सेवा सुरू असते. तिसरी आणि चौथी मार्गिका झाल्यास वाहतूककोंडी, लोकल उशिरा येण्याचे प्रमाण कमी होणे शक्य होईल.
या मार्गिकेवरील बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर आणि कर्जत ही प्रमुख स्थानके आहेत.
तिसरी आणि चौथी मार्गिका एकूण १४ किमी लांबीची असून १ हजार ५१० कोटी खर्च अपेक्षित आहे.
कल्याण कारशेड उभारणी
कल्याण रेल्वे स्थानक सर्वांत व्यस्त स्थानक आहे.
या स्थानकावर मेल, एक्स्प्रेससह कसारा, कर्जत, खोपोलीहून सीएसएमटी येथे जाणाºयासाठी लोकल येतात.
कल्याण - आसनगाव चौथी मार्गिका आणि कल्याण - बदलापूर तिसरी, चौथी मार्गिका तयार झाल्यास जादा सुविधा पुरविण्यासाठी कल्याण कारशेड उभारणे उपयुक्त आहे.
कम्युनिकेशन बेस्स ट्रेन कंट्रोल सिस्टम उभारणार
हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील सीएसएमटी-पनवेल, मध्य मार्गावरील धिम्या आणि जलद मार्गासाठी सीएसएमटी-कल्याण, पश्चिम रेल्वेमार्गावरील धिम्या आणि जलद मार्गासाठी चर्चगेट-विरार यावर कंट्रोल ठेवण्यासाठी सीबीटीसी प्रणाली उभारण्यात येणार आहे.
उपनगरीय लोकल, मेल, एक्स्प्रेस, माल गाडी यांचा प्रवास सुरक्षितरीत्या होण्यासाठी सिग्नलप्रमाणे सीबीटीसी प्रणाली काम करणार आहे.
सीएसएमटी-पनवेल एकूण ४९ किमी लांबीच्या मार्गासाठी १ हजार ३९१ कोटी रुपये, सीएसएमटी-कल्याण एकूण ५३ किमी लांबीच्या मार्गासाठी २ हजार १६६ कोटी रुपये, चर्चगेट-विरार एकूण ६० किमी लांबीच्या मार्गासाठी २ हजार ३७१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
इतर प्रकल्प
इलेक्ट्रॉनिक मल्टिपल युनिट लोकलमध्ये नवीन सुविधा, वीजपुरवठ्यामध्ये नवीन यंत्रणांचादेखील एमयूटीपी ३ अ या प्रकल्पात समावेश केला आहे.


१९१ वातानुकूलित लोकलला परवानगी
गर्दीमुळे प्रवाशांचा मृत्यू होण्याचे प्रमाण वाढल्याने जादा लोकल वाढविण्यात येतील
सध्या १२ डब्यांच्या २५८ लोकल असून त्यांच्या २ हजार ९५१ फेऱ्या होतात.
१९१ वातानुकूलित डब्यांसह आपोआप दरवाजे उघडझाप होण्याची सुविधा असेल.
>११९ रेल्वे स्थानकांची होणार सुधारणा
मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकाची सुधारणा करण्यात येणार आहे. यामध्ये ८० वर्षांहून जादा काळ झालेल्या स्थानकांची निवड आधी करण्यात आली आहे.
फलाटांची लांबी-रुंदी वाढविणे, सिग्नल यंत्रणा, पादचारी पूल, सरकते जिने, इतर सुविधा राबविण्यात येणार आहेत.
या प्रकल्पासाठी एकूण ९४७ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
>‘या’ प्रकल्पांचा फेरविचार
मुंबई नागरी परिवहन प्रकल्प टप्पा ३ अ मधील ५५ किमी लांबीची सीएसएमटी-पनवेल जलद मार्गिका, ७० किमी लांबीची विरार-पनवेल मार्गिका आणि १९ वातानुकूलित डब्यांवर फेरविचार करण्यात आला आहे.

Web Title: 33,000 crores for Mumbai railway projects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :localलोकल