ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ४ - रिझर्व बँकेने सर्वसामान्यांना दिलासा देत रेपो रेटमध्ये (रिझर्व्ह बँक ज्या दराने बँकांना अल्पमुदतीचे कर्ज देते त्याला रेपो रेट म्हणतात) पाव टक्क्यांची कपात केली आहे. आता रेपो रेट ७.५० टक्के राहणार आहे. या निर्णयामुळे आर्थिक वाढीला चालना मिळेल असा अंदाज असे त्याचे पडसाद शेअर बाजारातही उमटले. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स या निर्देशांकाने आरबीआयच्या न्रिणयानंतर उसळी घेतली आणि इतिहासात प्रथमच सेन्सेक्स ३०,००० अंकांच्या पलीकडे गेला. रेपो रेटमध्ये कपात झाल्याने गृहकर्ज, वाहनकर्जाच्या व्याज दरात कपात होण्याची दाट शक्यता असून रिझर्व बँकेने रेपो रेटमध्ये कपात केल्याने देशाच्या आर्थिक विकासाला गती मिळेल अशी आशा व्यक्त होत आहे.
मोदी सरकारने नुकत्याच मांडलेल्या अर्थसंकल्पाला शेअरबाजारात चांगला प्रतिसाद मिळत असतानाच आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी बुधवारी रिझर्व बँकेनेही रेपो रेटमध्ये कपात केली. रिझर्व बँकेने ७.७५ टक्क्यांवर असलेला रेपो रेट ७.५० टक्क्यांवर आणला आहे. तर कॅश रिझर्व्ह रेशिओ जैसे थे ( ४ टक्के) ठेवण्यात आले आहे. गेल्या महिनाभरात रिझर्व बँकेने दुस-यांदा रेपो रेटमध्ये कपात केली आहे. दीड महिन्यांपूर्वी जानेवारीमध्ये संक्रातीच्या कालावधीतही रिझर्व बँकेने रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांची कपात केली होती. रेपो रेटमध्ये आणखी कपात करण्याचा निर्णय अर्थसंकल्पानंतरच घेऊ असे सुतोवाच रिझर्व बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी केले होते. अर्थसंकल्प सादर झाल्याच्या चार दिवसांमध्येच राजन यांनी रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांची कपात करत सर्वसामान्यांना दिलासा दिला. महागाईच्या वाढीचा दर आटोक्यात आल्यामुळे व्याजदरामध्ये कपात करण्यात येईल असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला होता, ज्याला आजच्या आरबीआयच्या निर्णयामुळे पुष्टी मिळाली आहे.
रेपो रेटमध्ये कपात झाल्याने आता व्याज दरातही कपात होण्याची चिन्हे असून यामुळे गृहकर्ज, वाहन कर्ज अशा सर्वच प्रकारची कर्ज स्वस्त होतील. त्यामुळे एकीकडे सर्वसामान्य कर्जदारांना दिलासा मिळेल त्याच प्रमाणे उद्योगक्षेत्रालाही चालना मिळेल अशी आशा आहे.