मुंबई : रिझर्व्ह बँकेने अचानक निर्णय घेऊन धोरणात्मक व्याजदरांत कपात केल्यानंतर शेअर बाजारांनी जोरदार उसळी घेतली. नंतर मात्र नफा वसुलीचा फटका बसून बाजार जोरात आपटले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३0 हजारांच्या विक्रमी पातळीपर्यंत गेला होता. नंतर तो २१३ अंकांनी घसरला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही आधी वाढून नंतर ७३.६0 अंकांनी घसरला.
३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स सकाळी २९,९३७.२७ अंकांवर तेजीने उघडला. त्यानंतर काही मिनिटांतच तो ३0,0२४.७४ अंकांवर गेला. ही सेन्सेक्सची सर्वोच्च पातळी ठरली. त्यानंतर बाजारात नफा वसुलीचे सत्र सुरू झाले. त्याचा परिणाम होऊन बाजार धडाधड कोसळून खाली आला. शेवटच्या ९0 मिनिटांत तर तो २९,२८९.0५ अंकांपर्यंत खाली घसरला होता. दिवसाच्या सर्वोच्च पातळीच्या तुलनेत ही घसरण ७00 अंकांची होती. त्यानंतर सेन्सेक्स २९,३८0.७३ अंकांवर बंद झाला. २३१ अंकांची अथवा 0.७२ टक्क्यांची घसरण त्याने नोंदविली. गेल्या चार दिवसांपासून सेन्सेक्स तेजीत होता. या काळात सेन्सेक्सने ८५0 अंकांची वाढ मिळविली होती. या वाढीला आता ब्रेक लागला आहे.
३0 जानेवारी रोजी सेन्सेक्सने २९,८४४.१६ अंकांना स्पर्श केला होता. हा सेन्सेक्सचा आजपर्यंतचा सर्वोच्च बिंदूही होता. मात्र त्याच दिवशी सेन्सेक्स ४९९ अंकांनी कोसळला होता. वाढ आणि घसरणीचे हेच चित्र आज पाहायला मिळाले.
५0 कंपन्यांचा समावेश असलेला एनएसई निफ्टी विक्रमी ९११९.२0 अंकांवर पोहोचला होता. कालचा ९,00८.४0 अंकांचा इंट्रा-डे टप्पा त्याने ओलांडला. नंतर मात्र त्याला घसरण सोसावी लागली. सत्र अखेरीस कालच्या तुलनेत ७३.६0 अंकांची घसरण नोंदवून सेन्सेक्स ८,९२२.६५ अंकांवर बंद झाला. ही घसरण 0.८२ टक्के आहे.
घसरणीचा फटका बसलेल्या बड्या कंपन्यांत सेसा स्टरलाईट, टाटा पॉवर, हिंदाल्को, अॅक्सिस बँक, एसबीआय, कोल इंडिया, टाटा स्टील, एमअँडएम, विप्रो, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एचडीएफसी बँक यांचा समावेश आहे. या उलट सन फार्मा, बजाज आॅटो, आयटीसी, भारती एअरटेल आणि एचडीएफसी यांचे समभाग वाढले. तत्पूर्वी काल, विदेशी संस्थांनी ७७२.९२ कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले. जागतिक पातळीवरही नरमाईचा कल दिसून आला. आशियाई बाजारात घसरण दिसून आली. युरोप बाजारही सकाळच्या सत्रात खाली चालले होते.
सेन्सेक्समधील ३0 कंपन्यांपैकी २४ कंपन्यांचे समभाग घसरले. केवळ ६ कंपन्यांचे समभाग वाढले. बाजाराची एकूण व्याप्ती नकारात्मक राहिली.
१,८८७ कंपन्यांचे समभाग घसरले. १,00३ कंपन्यांचे समभाग वाढले. ११८ कंपन्यांचे समभाग स्थिर राहिले. स्मॉलकॅप आणि मीडकॅप निर्देशांक अनुक्रमे १.२८ टक्के आणि १.0६ टक्के घसरले.
बाजारातील एकूण उलाढाल वाढून ६,८६१.२२ कोटी झाली. काल ती ४,२२४.0६ कोटी होती.
३0 हजारांवर गेल्यानंतर शेअर बाजारात पडझड
रिझर्व्ह बँकेने अचानक निर्णय घेऊन धोरणात्मक व्याजदरांत कपात केल्यानंतर शेअर बाजारांनी जोरदार उसळी घेतली.
By admin | Published: March 5, 2015 12:06 AM2015-03-05T00:06:41+5:302015-03-05T00:06:41+5:30