Join us

जिवघेणी झिंग

By admin | Updated: June 21, 2015 02:03 IST

दहा वर्षांनी मुंबईत पुन्हा एकदा दारूकांड घडलंय. २००४मध्ये विक्रोळी, ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यांच्या हद्दीतल्या अवैध गुत्त्यांवर मिथेनॉलमिश्रित विषारी दारू पिऊन एकूण १०९ जण ठार झाले होते.

- जयेश शिरसाट (प्रासांगिक)दहा वर्षांनी मुंबईत पुन्हा एकदा दारूकांड घडलंय. २००४मध्ये विक्रोळी, ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यांच्या हद्दीतल्या अवैध गुत्त्यांवर मिथेनॉलमिश्रित विषारी दारू पिऊन एकूण १०९ जण ठार झाले होते. काल-परवा मालवणीत घडलेलं दारूकांड हा आकडा मागे टाकेल, असं दिसतंय. मरणारे हातावर पोट असलेले बिगारी, मजूर आहेत. स्वस्तातली दारू त्यांना बादली. त्यामुळे या दारूकांडाची काहीअंशी जबाबदारी मरणाऱ्यांचीही आहे.मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी या दारूकांडाला जबाबदार धरून मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रकाश पाटीलसोबत एकूण आठ अधिकारी-कर्मचाऱ्यांना निलंबित केलंय. राज्य उत्पादन शुल्क विभागानेही चार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केलीय. इतक्या कारवाईवर भागणार नाही. हे प्रकरण गंभीर आहे. या दारुकांडाने पुन्हा एकदा कुंपणच शेत खातंय, ही म्हण खरी ठरवलीय. ताजं दारूकांड मालवणीत अवैधपणे चालणाऱ्या अवघ्या तीन गुत्त्यांमुळे घडलं. तपासात त्याच ठिकाणी १५ ते २० गुत्ते चालत होते, अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. याहून धक्कादायक म्हणजे संपूर्ण शहरात गावठीचे असंख्य गुत्ते सुरू होते, जे कालच्या दारूकांडानंतर पोलिसांनी लगोलग बंद करवले! मुंबई पोलिसांच्या नाकाखाली राजरोसपणे अवैधपणे गावठी दारूची वाहतूक करणं, गुत्ते उघडून ही दारू विकणं निव्वळ अशक्य. प्रत्येक पोलीस ठाण्याला लोकसंख्येनुसार चार ते पाच बीट चौक्या आहेत. या बीट चौक्या म्हणजे छोटेखानी पोलीस ठाणेच. घडलेल्या कोणत्याही घटनेला सेकंदात प्रतिसाद देता यावा, तक्रार देता यावी, या उद्देशाने बीट चौक्या थाटण्यात येतात. बीट चौकीतल्या पोलिसांना गल्लीबोळात घडणारी प्रत्येक गोष्ट, नाक्यानाक्यावर होणारी बारीकसारीक चर्चा माहीत असते. पण त्यावर कारवाई करण्याऐवजी चिरीमिरी घेऊन बीट चौक्या अशा अवैध धंद्यांना, गुन्हेगारी प्रवृत्तींना अभय देतात. ज्या चौकीच्या हद्दीत जास्त बार, मटके, गुत्ते, एसआरए योजना तिथे नेमणुकीसाठी पोलिसांमध्ये स्पर्धा जुंपते. कधी कधी तर थेट मंत्रालयातून बीट चौकीसाठी शिफारशी येतात. मालवणीतलं दारूकांड याच चिरीमिरीच्या नादात घडलंय. मालवणीचे ते गुत्ते बीट चौकीपासून फार अंतरावर नाहीत; पण तरीही ते सुरू होते, यावरून सर्व काही स्पष्ट होतं. पोलिसांसोबत उत्पादन शुल्क विभागाची चौकीही या गुत्त्यांना लागूनच आहे. एरवी राजकारणी प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी करतातच. अस्लम शेख, सिराज शेख यांनी लोकहितासाठी आपल्या चार कार्यकर्त्यांना हाताशी घेत हे गुत्ते जमीनदोस्त केले असते, तर कदाचित अख्ख्या मुंबईनं त्यांचं कौतुक केलं असतं. पक्षानेही त्यांची पाठराखण केली असती. पण दोघांना गावठीचे गुत्ते चालणं जास्त महत्त्वाचं वाटलं. असं का, ते गुन्हे शाखेच्या तपासात समोर आलंही असेल. अटकेत असलेल्या गुत्तेचालकांनी कोणाकोणाला किती वाटत होतो याचा हिशोब गुन्हे शाखेला दिलाय. गुन्हे शाखेने तो रेकॉर्डवर घ्यावा आणि त्याचाही तपास करावा, अशी दारूकांडातल्या मृतांच्या नातेवाइकांची इच्छा आहे.