Join us

उत्पन्न बुडाले आणि रिकाम्या हाताने परतले

By admin | Updated: December 19, 2015 02:12 IST

२0१२-१६चा कामगार करार रद्द करून या कालावधीकरिता २५ टक्के पगारवाढीचा करार करण्यात यावा या मुख्य मागणीसाठी इंटककडून गुरुवारपासून पुकारण्यात

मुंबई : २0१२-१६चा कामगार करार रद्द करून या कालावधीकरिता २५ टक्के पगारवाढीचा करार करण्यात यावा या मुख्य मागणीसाठी इंटककडून गुरुवारपासून पुकारण्यात आलेला संप शुक्रवारी मागे घेण्यात आला. या संपामुळे प्रवाशांचे हाल होतानाच साधारपणे १२ कोटी रुपयांचे प्रवासी उत्पन्नही बुडाले. इंटकचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी कामगार करारात २५ टक्के पगारवाढीची मागणी करत गुरुवारपासून संपाची हाक दिली होती. या संपाला विदर्भ, मराठवाड्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. मात्र मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रात संप फसला. या संपामुळे प्रवाशांचे हाल झाले. दुपारनंतर संप मागे घेण्यात येत असल्याचे संघटनेकडून जाहीर करण्यात आले. यासंदर्भात परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी विधानसभेत निवेदनही दिले. नवीन कामगार करार हा १ एप्रिल २0१६पासून लागू होणार आहे. असे असतानाही केलेला हा संप म्हणजे फसवणूक असल्याची टीका महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव चव्हाण यांनी केली. गेल्या दोन दिवसांपासून इंटकचे अध्यक्ष तसेच अन्य पदाधिकाऱ्यांशी संपाबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला असता प्रतिसादच देण्यात आला नाही. (प्रतिनिधी)संपामुळे एसटीचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे हे नुकसान भरून कसे काढता येईल याचा विचार करत आहोत. संपात सामील झालेल्या कामगार, कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यासाठीही काही बाबी तपासल्या जात आहेत. - रणजित सिंह देओल, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ