Join us  

वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलमुळे संत्र्यांचे जागतिक ब्रँडिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 4:25 AM

मुंबई : नागपुरात डिसेंबरमध्ये होत असलेल्या वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलने विदर्भातील संत्र्याचे जागतिक ब्रँडिंग होईल.

मुंबई : नागपुरात डिसेंबरमध्ये होत असलेल्या वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलने विदर्भातील संत्र्याचे जागतिक ब्रँडिंग होईल. शिवाय, पर्यटनाचे नवे समृद्ध दालन उघडेल व रोजगाराच्या नव्या संधी प्राप्त होतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला.यूपीएल समूह, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) आणि ‘लोकमत’च्या वतीने १६, १७ व १८ डिसेंबर रोजी नागपुरात आयोजित करण्यात आलेल्या वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलच्या लोगोचे अनावरण आज मुुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी झाले. या महोत्सवाचे उद्घाटनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. लोगो अनावरणप्रसंगी ऊर्जा व उत्पादन शुल्कमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा, यूपीएलचे ग्लोबल सीईओ जय श्रॉफ, यूपीएलचे सीओओ (ग्लोबल बिझनेस) सागर कौशिक, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे, लोकमतचे कार्यकारी संचालक देवेंद्र दर्डा, लोकमतचे सहव्यवस्थापकीय संचालक व संपादकीय संचालक ऋषी दर्डा, लोकमतचे समूह संपादक दिनकर रायकर, एमटीडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोड, पर्नोड रिकार्ड कंपनीचे प्रमुख (कॉर्पोरेट अफेअर्स) प्रसन्न मोहिले आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री या वेळी म्हणाले की, नागपूरची संत्री चवदार आहेत, पण त्यांचे आजवर ग्लोबल ब्रँडिंग होऊ शकले नाही. वर्ल्ड फेस्टिव्हल हे त्यादृष्टीने महाद्वार ठरेल. नागपुरी संत्र्याचे टेबल फ्रूट म्हणून जगात सगळीकडे स्वागत होते. तथापि त्यापलीकडे जाऊन अत्यंत रसदार अशी संत्र्याची नवी जात विकसित करण्यात आली असून ती विदर्भाला समृद्धीकडे नेईल. नागपूरच्या वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलमध्ये संत्र्याविषयीचे देशविदेशातील तज्ज्ञ, उत्पादक कंपन्या, या क्षेत्रात रोजगार आणि पर्यटनाची संधी, संत्र्याचे मार्केटिंग यावर विचारांचे आदानप्रदान होऊन शेतकºयांच्या समृद्धीचा नवा मार्ग तयार होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.मंत्री जयकुमार रावल म्हणाले की, या फेस्टिव्हलच्या यशस्वी आयोजनासाठी एमटीडीसी पूर्ण ताकदीनिशी उतरत आहे. हा देशाचा, आशियाचाच नव्हे तर जगाचा मोठा महोत्सव व्हावा यावर आमचा भर राहील. त्यातून जगभरातील पर्यटक आकर्षिले जातील. संत्रे खायचे आणि वाघही पाहायचे असे दुहेरी मिश्रण विदर्भाच्या पर्यटनात आहे.विजय दर्डा म्हणाले की, जगाच्या आकर्षणाचे केंद्र ठरावे, असा हा महोत्सव सातत्याने आयोजित करण्याचा आमचा निर्धार आहे. शेतकºयांची उन्नती आणि रोजगाराची संधी मिळवून देण्याबरोबरच पर्यटकांनाही आकर्षित करण्याची अपार क्षमता संत्र्यामध्ये आहे आणि हा आॅरेंज फेस्टिव्हल हेच अधोरेखित करेल. लाखो लोकांनी या फेस्टिव्हलचा भाग व्हावे हा आमचा प्रयत्न असेल. हा केवळ लोकमतचा नव्हे तर सर्वांचाच महोत्सव होण्याची आवश्यकता आहे. नागपूर शहराने जगासाठी आयोजित केलेला हा महोत्सव आहे. सर्व प्रसार माध्यमांनी त्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन दर्डा यांनी केले. ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी या महोत्सवासाठी विजेच्या गतीने सहकार्य करण्याची हमी दिली.यूपीएलचे जय श्रॉफ म्हणाले की, भारताच्या विकासासाठी कृषी उत्पादकता आणि शेतकºयांचे दरडोई उत्पन्न वाढणे आवश्यक आहे. त्यासाठी शेतकरी ते ग्राहक अशी ‘व्हॅल्यू चेन’ तयार करावी लागेल. संत्र्याबाबत नेमके हेच वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलच्या माध्यमातून आम्ही साध्य करणार आहोत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि व्हॅल्यू चेनमुळे संत्र्याचे उत्पादन तिप्पट होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :नागपूर