मुंबई : शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्रशासन आणि निर्देशकांतील वादामुळे विद्यार्थ्यांचे प्रॅक्टीकल बंद असल्याने शैक्षणिक नुकसान होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. त्याची दखल घेत तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी सुवर्णमध्य साधण्याचा निर्णय घेतला आहे.उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार विद्यार्थ्यांचे प्रॅक्टिकल घेणे आमचे काम नसल्याचे सांगत, निर्देशकांना असहकार आंदोलन पुकारले होते. परीक्षा तोंडावर असूनही या समस्येवर काहीही तोडगा निघत नव्हता. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत होते. या संबंधीचे वृत्त ‘लोकमत’ ने प्रकाशित केले. त्याची दखल घेत वायकर यांनी तोडगा काढण्यासाठी निर्देशकांशी बैठक बोलावली आहे. यामध्ये निर्देशकांसोबत संवाद साधून वायकर सुवर्णमध्य साधणार असल्याची माहिती मिळाली आहे. राज्यात शासकीय तंत्रनिकेतनच्या एकूण ४३ शाखा आहेत. या सर्व शाखांमधील प्रॅक्टिकल निर्देशकांच्या असहाकारमुळे जुलै महिन्यापासून बंद असल्याची तक्रार पालक, विद्यार्थी आणि प्राध्यापक करत होते.शासकीय तंत्रनिकेतनमधील प्रत्येक अभ्यासक्रमासाठी प्रॅक्टिकल ज्ञान असणे आवश्यक असते. मात्र, तोडगा निघत नसल्याने पालक व विद्यार्थी हताश झाले होते. अखेर या समस्येवर चर्चा करण्यासाठी तंत्रशिक्षणमंत्री रविंद्र वायकर यांनी बैठक बोलावली असून लवकरच तिढा सुटेल, असा विश्वास विद्यार्थी- पालक आणि प्राध्यापकांनी व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)
निर्देशकांच्या समस्या सोडवणार - रवींद्र वायकर
By admin | Updated: September 27, 2016 03:09 IST