Join us  

‘त्या’ ब्रिटिशकालीन तोफा वाढविणार राजभवनाची शान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 2:13 AM

राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आपल्या कारकिर्दीत राजभवनाची दारे जनसामान्यांसाठी खुली केली. मलबार हिलच्या विस्तीर्ण परिसरात विसावलेल्या राजभवन परिसरातील ऐतिहासिक खजानाच एक प्रकारे या काळात उघड होत आहे

मुंबई : प्रत्येकी २२ टन वजन, ४.७ मीटर लांब आणि सव्वा मीटरचा व्यास, १८० ते १८५ किलो वजनी गोळ्याने समुद्रातील थेट साडेपाच किलोमीटरपर्यंतच्या जहाजांचा वेध घेण्याची मारक क्षमता असलेल्या ‘त्या’ दोन अजस्त्र ब्रिटिशकालीन तोफा. आधीच देखण्या आणि विहंगम असलेल्या राजभवनाच्या सौंदर्यात आता या दोन तोफांमुळे आणखी भर पडणार आहे.

राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आपल्या कारकिर्दीत राजभवनाची दारे जनसामान्यांसाठी खुली केली. मलबार हिलच्या विस्तीर्ण परिसरात विसावलेल्या राजभवन परिसरातील ऐतिहासिक खजानाच एक प्रकारे या काळात उघड होत आहे. २०१६ साली येथे १३ खोल्या आणि १५०० चौरस फूट लांबीचे बंकर आढळून आले. त्यानंतर गेल्याच वर्षी ३ नोव्हेंबर रोजी राजभवनाच्या पश्चिमेकडील पायथ्याशी या दोन अजस्त्र तोफा सापडल्या. स्वत: राज्यपालांनी या तोफांचे जतन करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार अनेक दशके दुर्लक्षित अवस्थेत पडल्याने गंजलेल्या या तोफांवर प्रक्रिया करण्यात आली. गंजप्रतिबंधक मुलामा देण्यात आला. त्यानंतर तोफा ठेवण्यासाठी जलविहार सभागृहाबाहेर दोन चौथरे तयार करण्यात आले. या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रविवारी या तोफा राजभवनातील ‘जलविहार’ सभागृहाबाहेर प्रस्थापित करण्यात आल्या.

रविवारी, तब्बल पाच तासांच्या प्रयत्नानंतर प्रत्येकी २२ टन वजनाच्या या तोफा ३०० टन क्षमतेच्या क्रेन्सच्या मदतीने उचलून जलविहार सभागृहाबाहेर दोन चौथऱ्यांवर ठेवण्यात आल्या. ‘जलविहार’ सभागृहात राज्यपाल विविध देशांच्या राष्ट्रप्रमुखांना भेटत असतात. त्यामुळे या तोफा आता राज्यपालांना भेटायला येणाºया देशी-विदेशी पाहुण्यांना तसेच राजभवनाला भेट देणाºया नागरिकांना पाहता येणार आहेत.गेल्या वर्षी राजभवन येथे समुद्राच्या पायथ्याशी वृक्षारोपण सुरू असताना कर्मचाऱ्यांना मातीमध्ये दबलेल्या या दोन वजनदार तोफा दिसल्या होत्या. तेंव्हा या दोन्ही तोफा क्रेनच्या मदतीने पायथ्यापासून उचलून जवळच असलेल्या हिरवळीवर तात्पुरत्या स्वरूपात ठेवण्यात आल्या होत्या.

साधारण १८६० ते १८८० या कालावधीत या तोफा बांधण्यात आल्याची माहिती नौदलाच्या अधिकाºयांनी दिली आहे. ब्रिटिशकाळात विविध ठिकाणी अशा तोफा बसविण्यात आल्या होत्या. राजभवनात सध्या जिथे हेलिपॅड आहे तिथे खाली तोफांचा बुरूज होता. महालक्ष्मी, ऑइलस्टर रॉक आदी भागांतही या तोफा सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. समुद्रात साधारण पाच ते साडेपाच किलोमीटरपर्यंतच्या लक्ष्याची वेध घेण्याची या तोफांची क्षमता होती. मात्र, या तोफांचा कधी वापर झाला होता का, याबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध नसल्याचे राज्यपालांचे जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर यांनी सांगितले.