Join us  

लाइट सुरू ठेवल्याच्या रागातून पत्नीची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 2:18 AM

शिवडीतील घटना: गुन्हा दाखल; पतीला अटक

मुंबई : रात्री झोपताना लाइट सुरू ठेवल्याच्या वादातून पतीने रागाच्या भरात २५ वर्षीय पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी मध्यरात्री शिवडीमध्ये घडली. या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून शिवडी पोलिसांनी पती बिलाल शेखला अटक केली आहे.शिवडीतील दारुखाना परिसरात राहत असलेल्या बिलाल शेख (२६) याचा याच परिसरातील लिपी (२५) नावाच्या तरुणीसोबत विवाह झाला होता. विवाहानंतर काही दिवसांतच दोघांमध्ये किरकोळ कारणातून खटके उडू लागले. शुक्रवारी मध्यरात्री लाइट सुरू ठेवल्यावरून शेखने वाद घातला. शेख दाम्पत्यातील वाद विकोपाला जाऊन बिलालने पत्नीला शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर बिलालनेतिचे नाक-तोंड दाबत गळा आवळून हत्या केली. शेजाऱ्यांकडून या भांडणाची माहिती मिळताच बिलालच्या घरी पोहोचलेल्या लिपीच्या आईला ती बेशुद्धावस्थेत सापडली. तिने स्थानिकांच्या मदतीने लिपीला उपचारांसाठी तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र येथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात नाक-तोंड दाबून आणि गळा आवळून लिपीची हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी तीची आई मुनीरा शेख (५०) हिची फिर्याद नोंदवून घेतली. तिच्या तक्रारीवरून बिलालविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून घेत त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

टॅग्स :गुन्हा