Join us  

दोन जिल्हाधिकारी, दोन पालकमंत्री असणाऱ्या शहरासाठी दोन पालिका आयुक्त का नसावेत..? अस्लम शेख यांचा भाजपा नेत्यांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2021 6:32 PM

Mumbai News : मुंबईसाठी दोन जिल्हाधिकारी असतील, दोन पालकमंत्री असतील तर दोन आयुक्त का नसावेत..? यामागे कोणता तर्क आहे असा प्रश्न  त्यांनी भाजपा नेत्यांना विचारला आहे.

- मनोहर कुंभेजकर मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी दोन आयुक्त नेमण्याच्या मुद्द्यावरून मुंबईचे राजकीय वातावरण ढवळून निघत असतानाच मुंबईचे पालकमंत्री व राज्याचे मत्स्यव्यवसाय, वस्त्रोद्योग व बंदर खात्याचे मंत्री अस्लम शेख यांनी आज भाजपा नेत्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. जर मुंबईसाठी दोन जिल्हाधिकारी असतील, दोन पालकमंत्री असतील तर दोन आयुक्त का नसावेत..? यामागे कोणता तर्क आहे असा प्रश्न  त्यांनी भाजपा नेत्यांना विचारला आहे.

काल लोकमत ऑनलाईन व आजच्या लोकमतच्या अंकात याबाबत सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले होते. मुंबई महानगर पालिकेला दोन आयुक्त असावेत अशी मागणी अस्लम शेख यांनी केली होती,तर ही मागणी म्हणजे मुंबई तोडण्याचा डाव असून भाजपा कदापी हा डाव यशस्वी होऊ देणार नाही असा इशारा मुंबईचे प्रभारी व कांदिवली पूर्व विधानसभा मतदार संघाचे आमदार अतुल भातखळकर यांनी मंत्री महोदयांना दिला होता.

 यावर आज खास सोशल मीडियावर व्हिडिओ जारी करत अस्लम शेख यांनी आपली भूमिका विषद केली. मुंबईला जर दोन जिल्हाधिकारी, दोन पालकमंत्री असणाऱ्या शहरासाठी दोन पालिका आयुक्त का नसावेत..? अशी भूमिका त्यांनी लोकमतकडे मांडली.

 अस्लम शेख म्हणाले की, मागील दहा वर्षांमध्ये मुंबईची लोकसंख्या ३० टक्क्यांनी वाढली आहे. या वाढलेल्या लोकसंख्येला पायाभूत सोयीसुविधा पुरवताना संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेवर प्रचंड ताण येत आहे. मुंबई महानगरपालिकेचं मुख्यालय छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे असल्या कारणाने मुंबई उपनगरात राहणाऱ्या नागरिकांना प्रशासकीय कामांसाठी तासन-तास प्रवास करावा लागतो.

 मुंबई उपनगरात राहणाऱ्या नागरिकांना प्रशासकीय व्यवहार करणं सुलभ व्हावं यासाठी जर मुंबई उपनगरासाठी व शहरसाठी स्वंतत्र जिल्हाधिकारी असतील व नागरिकांची समस्या समाधानाची प्रक्रिया वेगाने व्हावी यासाठी  दोन पालकमंत्री असतील तर बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी दोन आयुक्त नेमण्याच्या मुद्द्याला भाजपा नेत्यांचा विरोध का..? दोन जिल्हाधिकारी व दोन पालकमंत्र्यांमुळे जर मुंबईचे विभाजन होत नसेल तर मुंबईसाठी दोन आयुक्त नेमणे हा मुंबई विभाजनाचा डाव कसा काय ठरु शकतो असा प्रश्न त्यांनी भाजपा नेत्यांना विचारला आहे. 

टॅग्स :मुंबईमुंबई महानगरपालिका