अमर मोहिते, मुंबईआग लागल्यानंतर नागरिकांनी लिफ्टचा वापर करू नये, यासाठी उद्वाहन विभाग विशेष मोहीम हाती घेणार आहे. याअंतर्गत मुंबईतील प्रत्येक गृहनिर्माण सोसायटीला सुरक्षेची मार्गदर्शकत्वे असलेली नोटीस धाडली जाणार आहे. शाळा व महाविद्यालयांमधून लिफ्ट सुरक्षेचे धडे दिले जाणार आहेत.एन. आय. पाटील, विद्युत निरीक्षक(उद्वाहन विभाग) यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, पवई येथील इमारतीला लागलेल्या आगीत सात जणांचा लिफ्टमध्ये गुदमरून मृत्यू झाला. आग लागल्यानंतर अशाप्रकारे बळी जाण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्यामुळे आमचा विभाग यासाठी वर्षभर जनजागृती करतच असतो. तरीही असे प्रकार घडतात हे दुर्दैव आहे.मात्र यापुढे असे प्रकार रोखण्यासाठी आम्ही विशेष मोहिम हाती घेणार आहोत. लिफ्टची देखभाल करण्याऱ्या कंपन्यांना यासाठी काही मार्गदर्शकतत्त्वे जारी करण्याचे आदेश दिले जातील. या कंपन्या त्यांच्या कार्यक्षेत्रात येत असलेल्या इमारतींमधील रहिवाशांना व भाडेकरूंना सुरक्षेचे धडे देतील.आग लागल्यानंतर नेमके काय करावे किंवा सर्वसाधारण लिफ्ट बंद पडल्यावर काय करावे, याची मार्गदर्शकतत्त्वे या कंपन्या इमारतींना देतील. याची नोटीस दर्शनीय ठिकाणी लावावी, असेही या कंपन्या सोसायट्यांना सांगतिल, असे पाटील यांनी सांगितले. तसेच लिफ्ट सुरक्षेचे धडे लहान वयापासूनच मिळावेत यासाठी शाळा व महाविद्यालयात याचे मार्गदर्शन केले जाणार आहे. उद्वाहनाला राज्य शासनाच्या परवानगीची आवश्यकता असते.
गृहनिर्माण सोसायट्यांना नोटीस पाठविणार
By admin | Updated: June 8, 2015 02:51 IST