दिपक मोहिते, वसईवसई-विरार शहर महानगरपालिकेच्या नवघर-माणिकपूर क्षेत्रामधील सर्वात मोठा म्हणून या प्रभागाची ओळख आहे. या प्रभागात चुळणेगांव, कौल-अगरवाल परिसर, बऱ्हाणपुरचा काही भाग, स्टेला व माणिकपूर पाण्याच्या टाकीच्या बाजुचा परिसर इ. वसाहतीचा समावेश आहे. या प्रभागामध्ये मध्यमवर्गीयांचा सर्वाधिक भरणा आहे. नागरीसुविधांचे अनेक प्रश्न मार्गी लागले असले तरी पाण्याचा प्रश्न अद्याप सुटू शकलेला नाही. सुमारे ११ कोटी रू. विकासकामांवर खर्च केल्याचा दावा स्थानिक नगरसेविका किरण चेंदवणकर यांच्याकडून करण्यात आला. पूर्वी हा प्रभाग नवघर-माणिकपुर नगरपरिषदेमध्ये होता. गेल्या २० वर्षात या प्रभागामध्ये प्रचंड नागरीकरण झाले व अनेक गृहनिर्माण संस्था निर्माण झाल्या. कालांतराने हा संपुर्ण परिसर महानगरपालिकेत समाविष्ट झाला. गेल्या साडेचार वर्षात रस्ते डांबरीकरण, रंगमंच पुनर्बांधणी व अन्य विकासकामे पार पडली. स्थानिक नगरसेविका किरण चेंदवणकर यांनी महानगरपालिकेच्या पेटीट हॉस्पिटलमध्ये लहान मुलांसाठी आयसीयूची मागणी केली होती व ती मार्गी लागल्यामुळे प्रभागातील नागरीकांना दिलासा मिळाला आहे. पाण्याच्या प्रश्नासंदर्भात गेली साडेचार वर्षे त्यांच्याकडून जोरदार प्रयत्न करण्यात आले. टाकीतून थेट पाणी प्रभागाला दिले जात नसल्यामुळे पाण्याचा प्रश्न अत्यंत बिकट बनला आहे. त्यामुळे त्यांनी अगरवाल परिसरातील टाकी लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी केली आहे. सध्या या टाकीचे ५ टक्के काम शिल्लक असल्याचे सांगण्यात येते. या मागणीसोबत महानगरपालिकेच्या परिवहन सेवेने महिलांसाठी संध्याकाळच्या सुमारास विशेष बस सोडावी अशी मागणी केली आहे.
प्रभागातील पाणी प्रश्न बिकटच
By admin | Updated: March 9, 2015 22:58 IST