Join us

डोंबिवलीकर महिलांच्या आंदोलनावर पाणी

By admin | Updated: June 15, 2015 23:25 IST

शुक्रवारी पहाटेपासून दिवसभर एमआयडीसी भागातील आजदेगाव परिसरात महावितरणच्या मुख्य विद्युत प्रवाहात बिघाड झाल्याने

डोंबिवली : शुक्रवारी पहाटेपासून दिवसभर एमआयडीसी भागातील आजदेगाव परिसरात महावितरणच्या मुख्य विद्युत प्रवाहात बिघाड झाल्याने येथील वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यानंतर, मंगळवारी गणेश मंदिरलगतच्या विद्युतपुरवठा करणाऱ्या यंत्रणेतही बिघाड झाल्याने अचानक शटडाऊन घेण्यात आले होते. त्यातच, गुरुवारीही पावसाचा शिडकावा होत नाही तोच पूर्वेकडील वीज १५ मिनिटांसाठी खंडित झाली होती. सातत्याने उद्भवणाऱ्या या समस्येमुळे हैराण झालेल्या काही डोंबिवलीकर महिला ग्राहकांनी बुधवारी आंदोलन करूनही त्याचा अधिकाऱ्यांवर काहीही परिणाम झाला नसून स्थिती जैसे थे असल्याची टीका सर्वत्र होत आहे.वेळोवेळी घेण्यात येणाऱ्या शटडाऊनबाबतची माहितीही नागरिकांना मिळत नसल्याने अचानक उद्भवलेल्या या अडचणींमुळे ही नाराजी अधिक वाढत आहे. पूर्वी महावितरणच्या माध्यमातून ज्या भागात वीजपुरवठा खंडित होणार आहे, त्या परिसरात रिक्षाच्या माध्यमातून नागरिकांना अ‍ॅलर्ट केले जायचे, जनजागृती व्हायची. आता तसे होताना दिसत नसल्याने महावितरणचा मनमानी कारभार सुरू आहे का? की नागरिकांना गृहीत धरले जात आहे, असा सवाल ज्येष्ठ नागरिकांकडून विचारला जात आहे.