नवी मुंबई : वाशी विभागात गढूळ पाणीपुरवठा होत असल्याने नागरी आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेले काही दिवस नागरिकांना हा मातीमिश्रित पाण्याचा पुरवठा होत आहे. याच परिसरातील लहान मुलांना उलट्यांचा त्रास होत असल्याने त्यांना पाण्याची बाधा होत असल्याची शंकाही स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.वाशी सेक्टर १५ मधील रहिवाशांना पिण्याच्या पाण्यासंदर्भात ही समस्या भासत आहे. गेले १० दिवस गढूळ पाणीपुरवठा होत असल्याचे रहिवासी आरती ढोले यांचे म्हणणे आहे. पहिला पाऊस पडल्यापासून सुरु झालेला हा गढूळ पाण्याचा पुरवठा अद्यापही सुरुच आहे. हे पाणी गाळून घेतल्यानंतरही त्यामध्ये मातीचे प्रमाण आढळत असल्याचे आरती ढोले यांचे म्हणणे आहे. या प्रकाराने तेथे नागरी आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून याच परिसरातील लहान मुलांना ताप, उलट्या होण्याच्या समस्या जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे महापालिकेकडून पुरवठा होणारे गढूळ पाणीच त्यांना बाधत असल्याची शंका नागरिकांकडून व्यक्त होत आहे. मात्र महापालिकेला या प्रकाराची चाहूल देखील नाही. गढूळ पाणीपुरवठा होत असल्यासंदर्भातची तक्रार अद्याप आपल्याकडे आली नसल्याचे कार्यकारी अभियंता अरविंद शिंदे यांनी सांगितले. मात्र तसा प्रकार घडत असल्यास खबरदारीचे योग्य पाऊल उचलले जाईल, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
वाशीत दूषित पाणीपुरवठा
By admin | Updated: July 14, 2014 01:55 IST