Join us

येथे मिळते तब्बल ३६ तासांनी पाणी

By admin | Updated: March 12, 2015 22:40 IST

महानगरपालिकेचा प्रभाग क्र. ७४ हा नवघर शहराच्या पश्चिमेस साईनगर भागात आहे. तत्कालीन नगरपरिषदेमध्ये असताना या प्रभागातील अनेक विकासकामे मार्गी लागली होती

दिपक मोहिते, वसईमहानगरपालिकेचा प्रभाग क्र. ७४ हा नवघर शहराच्या पश्चिमेस साईनगर भागात आहे. तत्कालीन नगरपरिषदेमध्ये असताना या प्रभागातील अनेक विकासकामे मार्गी लागली होती. विद्यमान नगरसेवक संदिप पाटील यांच्याकडे बांधकाम समिती सभापतीपद देण्यात आल्यामुळे प्रभागातील विकासकामांना बऱ्यापैकी आर्थिक निधी मिळाला व विकासकामे मार्गी लागली.काही वर्षापूर्वी या प्रभागामध्ये दर पावसाळ्यात पाणी साचून जनजीवन विस्कळीत होत होते. तत्कालीन नगरपरिषदेच्या कार्यकालात येथील नाले रूंद करण्यात आल्यामुळे पावसाळी पाण्याचा निचरा योग्य प्रमाणात होऊ लागला व नागरीकांना दिलासा मिळाला. गेल्या साडेचार वर्षात येथील विकासकामांवर ४ कोटी रू. खर्च करण्यात आले. रस्ते, गटारे, उद्यान, व्यायामशाळा व स्पोर्टस् कॉम्प्लेक्सचे काम या खर्चातून करण्यात आले. प्रभागात जमा होणारा कचरा दररोज उचलला जातो असा नगरसेवक पाटील यांचा दावा आहे. परंतु काही भागात दुपारी उशीरापर्यंत कचरा साचलेला पहावयास मिळतो. पाण्याचा प्रश्न कायम असून दररोज पाणी येण्याऐवजी ३६ तासांनी पाणी येत असल्यामुळे या प्रभागातील नागरीकांना पाणी जपून वापरावे लागते. प्रभागातील काही गृहनिर्माण संस्थांना मात्र कमी दाबामुळे पाणी मिळत नसल्यामुळे टँकरचा आधार घ्यावा लागतो. पाण्याची समस्या ही या प्रभागातील महत्वाची समस्या असून ती लवकरात लवकर मार्गी लागावी यासाठी महानगरपालिका प्रशासनाने हा प्रश्न त्वरीत हाती घ्यावा अशी करदात्यांची मागणी आहे. अन्यथा उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागू शकते.