Join us  

आर मध्य आणि आर उत्तर प्रभागात अनेक विधायक उपक्रम राबवणार- प्रभाग समिती अध्यक्ष रिद्धी खुरसंगे 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2018 9:12 PM

- मनोहर कुंभेजकर

मुंबई - आर मध्य आणि आर उत्तर प्रभागात लोकप्रतिनिधी व पालिका प्रशासनच्या सहकार्याने अनेक विधायक उपक्रम राबवणार असून या दोन्ही प्रभाग समितीचा कारभार लोकाभिमुख करणार असल्याची ठाम ग्वाही आर मध्य आणि आर उत्तर प्रभाग समितीच्या नवनिर्वाचित अध्यक्षा रिद्धी खुरसंगे यांनी दिली.२०१८-२०१९ साठी यंदा आर मध्य आणि आर उत्तर या दोन्ही प्रभाग समिती अध्यक्षपदाची माळ रिद्धी खुरसंगे यांच्या गळ्यात पडली आली आहे.मावळत्या प्रभाग समिती अध्यक्षा शीतल म्हात्रे यांच्या कडून त्यांनी या प्रभाग समिती अध्यक्षपदाची नुकतीच सूत्रे स्विकारली आहेत.पश्चिम उपनगरातील सर्वात मोठा प्रभाग म्हणून हे दोन प्रभाग ओळखले जातात.प्रभाग समिती अध्यक्ष म्हणूूून कोणते उपक्रम राबवणार याबाबत त्यांनी लोकमतशी बोलतांना आपली भूमिका स्पष्ठ केली.बोरिवली आणि दहिसरमध्ये विकासकामे होत असून, लोकसंख्या आणि नागरिकांच्या समस्याही वाढत आहेत. नागरिकांना होणारा अपुरा पाणीपुरवठा तसेच दूषित पाणीपुरवठा, तुंबणा-या मलनि:स्सारण वाहिन्या वाहतूक समस्या याकडे संबंधित अधिका-यांनी लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. प्रभागातील नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा करण्यात यावा, रस्त्यावर व पदपथांवर वाढणारे अतिक्रमण यावर कारवाई करावी जेणेकरून पदपथ नागरिकांच्या चालण्यासाठी मोकळे होतील अशा अनेक सूचना त्यांनी प्रशासनास केल्या आहेत. दहिसर नदीचे सुशोभीकरण आणि स्वच्छतेकडे प्रशासनाने प्रामुख्याने लक्ष देणे गरजेचे आहे.तसेच पावसाळ्यापूर्वी नाल्यांची तसेच उघड्या गटारांची सफाई करावी, काढलेल्या गाळाची लवकर योग्य ती विल्हेवाट लावण्याची सूचना त्यांनी पालिका प्रशासनाला दिल्या  आहेत.  स्वच्छ व हरित मुंबईचा विडा उचलताना आर मध्य आणि आर उत्तर प्रभाग समितीच्या प्रभाग स्वच्छ व हरित राहण्यासाठी ठोस उपाययोजना राबवणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.या दोन प्रभागांमधील स्वच्छता व साफसफाई राखण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. पावसाळ्याच्या सुरवातीस प्रभाग समिती कार्यक्षेत्रामध्ये भारतीय प्रजातीच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात यावे जेणेकरून पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल अशी महत्वाची सूचना त्यांनी पालिका प्रशासनाला केली आहे.रस्त्यांचे डांबरीकरण, रस्त्यांवरील चर व खड्डे बुजवणे, पदपथांची दुरुस्ती करून त्यांचे सुशोभिकरण करणे, नाल्यांमधील गाळ काढणे, मलनि:स्सारण वाहिन्या साफ करणे व त्यांची दुरुस्ती करणे, शाळांची पुनर्बांधणी व रुग्णालयांची दुरुस्ती,उद्यानाचा विकास, जुन्या शौचालयांचे नूतनीकरण या विविध कामांमध्ये प्रशासनाने लक्ष देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. विभाग पातळीवर करण्यात आलेली तरतूद लॅप्स होणार नाही याचीही प्रशासनाने काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,रश्मी ठाकरे,युवासेना प्रमुख व शिवसेना नेते आदित्य ठाकरे ,मुंबई महापौर विश्वनाथ महाडेश्वर, उप-महापौर हेमांगी वरळीकर, पालिका सभागृह नेत्या विशाखा राऊत,आमदार प्रकाश सुर्वे, विभागप्रमुख विलास पोतनीस, महिला विभाग संघटक रश्मी भोसले, शिवसेनेचे समस्त पदाधिकारी, आर मध्य आणि आर उत्तर प्रभाग समितीतील सर्व नगरसेवक यांनी समिती अध्यक्षपदाची संधी दिल्याबद्दल त्यांचे शेवटी आभार व्यक्त केले आहेत.

टॅग्स :मुंबईशिवसेनाबातम्या