मुंबई : मानाचे पद समजले जाणारे मुंबईचे नगरपाल (शेरीफ) पद गेल्या पाच वर्षांपासून रिक्त आहे. २००९ पासून रिक्त असलेल्या या पदावर तातडीने नियुक्ती करावे, यासाठी सेना आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी करणार आहेत.देशात मुंबई आणि कोलकाता या शहरांमध्येच मानाचे शेरीफ पद अस्तित्वात आहे. मुंबईच्या जडणघडणीत प्रभावी कामगिरी करणारे उद्योगपती, बॉलीवूड, खेळाडू, बांधकाम व्यावसायिक, सामाजिक क्षेत्रातील व्यक्तीची नेमणूक शासनामार्फत करण्यात येते. या पदावर वर्णी लावण्यास इच्छुक दिल्लीतील नेत्यांपर्यंत फिल्डिंग लावत असतात. २००९ मध्ये इंदू सहानी यांच्यानंतर शासनाने शेरीफपदी कोणाचीही नियुक्ती केली नव्हती. या पदावर संबंधित व्यक्तीची शासनाने नियुक्ती करावी, अशी मागणी शिवसेना आमदार सुनील प्रभू मुख्यमंत्र्यांकडे करणार आहेत. (प्रतिनिधी)
मुंबई नगरपालाच्या प्रतीक्षेत, शिवसेना आमदार करणार नियुक्तीची मागणी
By admin | Updated: December 17, 2014 01:49 IST