Join us

शेतकरी हमीभाव केंद्राच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: December 17, 2014 23:00 IST

खरीप हंगाम संपून दोन महिन्यांचा अवधी उलटूनही शासकीय भात हमीभाव केंद्र सुरु न झाल्याने शेतकऱ्यांना कमी दराने आपले भात दलालांच्या काट्यावर न्यावे लागत आहे.

पेण : खरीप हंगाम संपून दोन महिन्यांचा अवधी उलटूनही शासकीय भात हमीभाव केंद्र सुरु न झाल्याने शेतकऱ्यांना कमी दराने आपले भात दलालांच्या काट्यावर न्यावे लागत आहे. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात सुरु होणारी भात हमीभाव केंद्रे यावर्षी सुरु होण्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागली असून पेणच्या खरेदी-विक्री संघाला हमीभाव केंद्रावर भात साठवणूक करण्यासाठी गोदामाची समस्या उद्भवल्याने हमीभाव केंद्राची सुरूवात नवीन वर्षात होण्याची शक्यता आहे. खरीप संपताक्षणी शेतकऱ्यांना जमाखर्चाचा ताळेबंद मांडून मजुरी व इतर खर्चासाठी आपल्या भाताची विक्री करावी लागते. शासनाची हमीभाव केंदे्र सुरु होण्यास महिन्याचा कालावधी लागतो. गेल्यावर्षी २०१३-१४ मध्ये पेणच्या खरेदी-विक्री संघाने पेण, वडखळ, कळवे या तीन केंद्रांवर तब्बल १३,५०० क्विंटल भाताची खरेदी केली व त्याची साठवणूक येथील गोडावूनमध्ये केली आहे. शासनाकडून भरडाईसाठी भात मिलरकडे जाणाऱ्या या खरेदी केलेल्या भाताची ३,५०० क्विंटल उचल झाली. उर्वरित १०,००० क्विंटल भात या गोडावूनमध्ये तसेच पडून आहे. नवा खरेदी केलेला उघड्यावर मैदानात भात ठेवावा तर अवेळी पडणारा पाऊस व बदललेला निसर्ग यांची कधी अवकृपा होईल या भीतीने खरेदीदार संस्थांना भीती वाटते. (वार्ताहर)