नवी मुंबई : दहा वर्षापूर्वी नवी मुंबईत गाजलेला विलास जाधव खून खटला नव्याने सुरू करण्यात आल्याने ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे नवी मुंबई जिल्हाप्रमुख विजय चौगुले पुन्हा अडचणीत सापडले आहेत. 23 सप्टेंबर 2012 रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार हा खटला आता नव्याने सुरू करण्यात आला आहे.
यासंदर्भातील राज्य सरकारचे क्रिमिनल अपील (क्रमांक 4148/2007) आणि मयत विलास जाधव यांच्या पत्नी विभूती यांचे अपील (क्रमांक 622/2007) या दोन अपिलांवर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आज सुनावणी झाली. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पी.व्ही.हरदास आणि अनुजा प्रभुदेसाई यांच्या दोन सदस्यीय खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. चौगुले आणि इतर दोन आरोपींच्या वतीने अॅड. गणोश गोळे यांनी न्यायालयात हजर राहून आपल्या अशिलांची बाजू मांडण्यासाठी चार आठवडय़ांची मुदत मिळावी, अशी विनंती न्यायालयाकडे केली. मात्र ही विनंती फेटाळून लावत न्यायालयाने दोन आठवडय़ात आपली बाजू मांडण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पुढील सुनावणी 29 सप्टेंबर 2014 रोजी होणार आहे.
विभूती जाधव यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ नितीन प्रधान आणि अॅड. राजाराम बनसोडे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)