वसई : यंगस्टार्स ट्रस्टतर्फे विरार विवा मलांज मैदानावर भव्य शाकाहारी खाद्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी एका शानदार सोहळ्यात या महोत्सवाचे उद्घाटन पार पडले. या प्रसंगी वसईचे आ. हितेंद्र ठाकूर, नालासोपाऱ्याचे आ. क्षितीज ठाकूर, महापौर नारायण मानकर, माजी महापौर राजीव पाटील व अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमासमवेत विविध सांस्कृतीक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले.सध्या चायनीज, थाई व अन्य जंकफुडचे सर्वत्र आक्रमण होत असताना वसई विरार परिसरातील यंगस्टार्स ट्रस्टने भारतीय व पारंपारीक खाद्यसंस्कृतीचे महत्व नागरीकांना पटवून देण्याच्या हेतुने खाद्य महोत्सवाचे आयोजन केले. आ. ठाकूर यांच्या पत्नी प्रविणा ठाकूर यांच्या संकल्पनेतून हा महोत्सव आयोजित करण्यात आला. प्रविणा ठाकूर यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात महिला उद्योजकांना अशा उपक्रमामधून प्रेरणा व प्रोत्साहन व संधी मिळावी याकरीता हा उपक्रम हाती घेण्यात आल्याचे सांगितले. आपल्या स्वयंपाकघरात खाद्य पदार्थांच्या विविधतेमध्ये अनेकता आपल्याला आढळते. हीच संस्कृती सर्वदुर पोहोचावी याकरीता महिलांनी एकत्र येऊन हा उपक्रम राबवला आहे असे सांगितले. या महोत्सवामध्ये देशभरातील विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. सायंकाळी ५ वा. सुरू होणारा हा महोत्सव रात्री उशीरापर्यंत सुरू असतो. (प्रतिनिधी)
शाकाहारी खाद्य महोत्सव
By admin | Updated: April 18, 2015 23:22 IST