वसई : या महानगरपालिकेच्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवारी अवघे ४८.८७ टक्के मतदान झाले . रविवारी पहाटेपासून कोसळलेल्या पावसाचा मतदानावर विपरीत परीणाम झाला. सकाळी ११ वाजेपर्यंत केवळ १७.१५ टक्के मतदान झाले. पहिल्या दोन तासात मतदान केंद्राकडे मतदार फिरकलेच नाही. १० वाजताच्या सुमारास काही मतदान केंद्रांवर तुरळक गर्दी बघायला मिळाली. दिवसभरात कुठेही अनुचित प्रकार घडला नसल्याचे निवडणूक विभागाने सांगितले. दुपारी १ नंतर पावसाने अधिक जोर धरल्यामुळे मतदानाचा वेग आणखीनच मंदावला. सायंकाळी वेळ संपली तेव्हा ४८.८७ टक्के मतदान झाल्याचे निवडणूक विभागाने सांगितले.सकाळी ७.३० वाजता मतदानास सुरुवात झाली. विरार शहरात पहाटे गेलेली वीज सकाळी ९.३० वाजता आली. त्याचाही परीणाम मतदान प्रक्रियेवर जाणवला. सततच्या पावसामुळे बहुतांश मतदारांना बाहेर पडणे टाळले. त्यामुळे सायंकाळपर्यंत मतदानाला वेग आला नाही. सकाळी ११ वाजेपर्यंत झालेले मतदान लक्षात घेता मतदान ४० ते ५० टक्क्यांच्या दरम्यान होईल, असा अंदाज उमेदवार व्यक्त करीत होते. मतदारांनी मतदानासाठी बाहेर पडावे याकरिता सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले. सर्वसाधारणपणे दुपारी २ नंतर मतदारांच्या केंद्रावर रांगा लागतात. परंतु यावेळी दुपारनंतर पावसाने जोर कायम राहिल्याने मतदानाचा वेग अधिकच मंदावला. ३६७ उमेदवारांचे भवितव्य इव्हीएसमध्ये बंद झाले असून आता मंगळवारी जाहीर होणाऱ्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कमी झालेल्या मतदानाचा फायदा कोणत्या पक्षाला होईल आणि फटका कोणत्या पक्षाला बसेल याबाबत तर्क वितर्क लढविले जात होते.
वसई :४८.८७ टक्केच मतदान
By admin | Updated: June 14, 2015 22:53 IST