मनोर : पालघर जिल्ह्यातील पूर्व भागातील गोऱ्हे गावाच्या हद्दीत सुरू असलेल्या कंपनीला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला जवळ असलेली वैतरणा न दाखविता २० कि. मी. लांब असलेल्या तानसा नदीचा उल्लेख करून ना हरकत दाखला दिल्याचे उजेडात आले आहे.गोऱ्हे येथे इकोरीच कॉस्मेटीक इंडिया प्रा. लि. कंपनीचे काम सुरू असून औद्योगिक बिनशेती जमीन व कंपनी सुरू करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दाखला लागतो परंतु प्रदूषण मंडळाच्या कल्याण येथील अधिकाऱ्यांनी कंपनी जवळून कोणती नदी वाहते त्याची शहानिशा न करता २० कि. मी. अंतरावर असलेली नदी तानसा दाखवून कंपनीला ना हरकत दाखला दिला आहे. मात्र ज्या ठिकाणी कंपनीचे काम सुरू आहे त्या गोऱ्हे गावाच्या बाजूने वैतरणा वाहते. वैतरणा नदीपासून कंपनीचे काम ८०० मी. वर सुरू परंतु वैतरणा नदी व सुरू असलेले काम नियमानुसार बसत नसल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने वैतरणा नदी गायब करून २० कि. मी. अंतरावर वाहणारी तानसा नदी दाखवून नियम धाब्यावर बसवून इकोरीच कॉस्मेटीक इंडिया कंपनीला ना हरकत दाखला दिल्याचे उघड झाले असून अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी परिसरातील जनतेची मागणी आहे. (वार्ताहर)
तानसाऐवजी दाखविली वैतरणा प्रदूषण मंडळाचे भलतेच सहकार्य
By admin | Updated: January 25, 2015 23:11 IST