Join us

माहिती अधिकाराचा वापर करा

By admin | Updated: May 19, 2014 05:17 IST

देशातील लोकशाहीत प्रत्येक नागरिक मालक असतो. प्रशासनात जे वाईट चालले आहे, त्याला राजकारणी जबाबदार असून नोकरशाही कारणीभूत आहे

डहाणू : देशातील लोकशाहीत प्रत्येक नागरिक मालक असतो. प्रशासनात जे वाईट चालले आहे, त्याला राजकारणी जबाबदार असून नोकरशाही कारणीभूत आहे. सरकारची व्यवस्थित बांधणी करून प्रशासनाच्या तंत्रात सुधारणा करून अधिकार्‍यांत आपलेपणाची भावना रुजविण्याची गरज असून प्रशासनातील दिरंगाई टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकाने महाराष्टÑ प्रिव्हेंशन आॅफ डिले हून डिसचार्ज आॅफ आॅफीशियल ड्युटीज रुल्स २०१३ आणि माहितीच्या अधिकाराचा वापर करण्याचे आवाहन भारत सरकारचे माजी माहिती आयुक्त शैलेश गांधी यांनी केले. डहाणू येथे सोसायटी फॉर फास्ट जस्टिस या स्वयंसेवी संस्थेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त भारत सरकारचे माजी माहिती आयुक्त शैलेश गांधी बोलत होते. यावेळी बृहन्मुंबईचे माजी उपायुक्त गो. रा. खैरनार, अ‍ॅड. सुचेता मिराशी यांनी दप्तरदिरंगाई आता कधीच नाही, कार्यकालातील अनुभव, स्त्रीहक्क आणि जागृती या विषयावर मार्गदर्शन केले. सोसायटी फॉर फास्ट जस्टीस डहाणूचे अध्यक्ष संतोष शेट्टी यांनीही संस्थेच्या वाटचालीची माहिती दिली. शैलेश गांधी पुढे म्हणाले की, निवडणुका होणे हा लोकशाहीचा अधिकार आहे. नागरिकाला मान, सन्मान मिळणे हा त्याचा हक्क आहे. सरकारी कामकाजाचा ढाचा बरोबर नाही. चांगले काम करणार्‍या अधिकार्‍याला पुढे न्यावे आणि वाईट काम करणार्‍या अधिकार्‍याला मागे ठेवण्याची पद्धत प्रशासनाला नाही. सार्‍यांनाच समान संधी देणे गरजेचे असून कुणावरही अन्याय होता नये, असेही ते म्हणाले. शासन, प्रशासन, न्यायव्यवस्था आणि पत्रकार हे लोकशाहीचे चार स्तंभापैकी शासन आणि प्रशासन ढासळून पडल्याने सर्व न्यायपालिकेवर येऊन पडले आहे. न्यायाला दिरंगाई करून अन्याय केला जात आहे. त्यासाठी न्यायव्यवस्थेत सुधारणा करून तत्पर न्याय मिळाला तरच न्याय मिळाल्यासारखे होईल, असे गो. रा. खैरनार यांनी मुंबईत राजकारण्यांपासून ते गुंडांची अनधिकृत बांधकामे तोडताना कसे हल्ले झाले या जुन्या आठवणींना उजाळा दिला, तर तक्रारी करण्यासाठी महिलांनी निर्भय होवून पुढे येण्याची जरूरी असल्याचे प्रतिपादन अ‍ॅड. सुचेता मिराशी यांनी केले. (वार्ताहर)