Join us

अखेर युती - आघाडीला पूर्णविराम; सर्व पक्ष स्वबळावर लढणार

By admin | Updated: March 30, 2015 23:35 IST

अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही नगरपरिषदांत आघाडी आणि युती होण्याच्या शक्यतेला पूर्णविराम मिळाला आहे. अंबरनाथमध्ये शिवसेना आणि भाजपाची रविवारी रात्री

पंकज पाटील, अंबरनाथअंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही नगरपरिषदांत आघाडी आणि युती होण्याच्या शक्यतेला पूर्णविराम मिळाला आहे. अंबरनाथमध्ये शिवसेना आणि भाजपाची रविवारी रात्री महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली होती. मात्र, जागावाटपावरून वाद झाल्याने दोन्ही पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढविण्याची तयारी ठेवली आहे. बदलापुरात युती होणार, अशा केवळ अफवांचाच पाऊस पडला. दुसरीकडे दोन्ही पालिकांत आघाडीबाबतही एकवाक्यता न झाल्याने आघाडीतही बिघाडी निर्माण झाली आहे. अंबरनाथ नगरपरिषद निवडणुुकीसाठी शिवसेना आणि भाजपा यांची युती व्हावी आणि त्यासंदर्भात चर्चा करून निर्णय घेण्याचे आदेश वरिष्ठांकडून आले होते. त्या अनुषंगाने शिवसेना आणि भाजपा यांच्यात युतीतील जागावाटपाची चर्चाही करण्यात आली. मात्र, भाजपाला अपेक्षित असलेल्या जागा देण्यास शिवसेना तयार नसल्याने या बैठकीतून कोणताच निर्णय निघालेला नाही. स्थानिक नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत निर्णय न झाल्याने सोमवारी रात्री वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे. मात्र, या चर्चेतही निर्णय होणे अवघड जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडे असलेल्या नगरसेवकांच्या प्रभागातही भाजपाचे दिग्गज उमेदवार इच्छुक असल्याने युती झाल्यास शिवसेना आणि भाजपातील उमेदवार फुटण्याची शक्यता आहे. आघाडीबाबतची चर्चा सोमवारी दिवसभर झालेली नाही. काँग्रेस आरपीआयला घेऊन आघाडी करण्यास तयार नसल्याने राष्ट्रवादीची कोंडी झाली आहे. रिपाइं व काँग्रेस यांची एकत्रित आघाडी होण्याचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले असून राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची आघाडी करता येईल का, याबाबतची चाचपणी सायंकाळी सुरू होती. मात्र, या चाचपणीतूनही कोणताच मार्ग न निघाल्याने काँग्रेस स्वतंत्र निवडणूक लढविण्याचे स्पष्ट संकेत आहेत. काँग्रेससोबत येत नसल्याने राष्ट्रवादी आणि रिपाइं सेक्युलर यांच्यात आघाडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बदलापूरच्या बाबतीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात तीन जागांच्या वादातून आघाडी तुटली आहे. त्यामुळे बदलापुरातील ४७ प्रभागांपैकी १३ जागांवर काँग्रेस उमेदवार देणार आहे. राष्ट्रवादीने उमेदवारांचा आकडा स्पष्ट केलेला नाही. बदलापुरात सेना आणि भाजपा यांच्यातच खरी लढत असतानाही युती होणार, अशी चर्चा दिवसभर होती. मात्र, दोन्ही पक्ष आपापले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविणार आहेत.