Join us  

...तेव्हा उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना दिली होती धमकी; नारायण राणेंचा आत्मचरित्रात गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2019 6:19 PM

शिवसेनेचे माजी नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणेंनी आत्मचरित्रातून खळबळजनक खुलासे केले आहे.

मुंबई- शिवसेनेचे माजी नेते, माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र  स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणेंनी आत्मचरित्रातून खळबळजनक खुलासे केले आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीनं हे वृत्त दिलं आहे. आत्मचरित्रात ते लिहितात, 14 एप्रिल 2005 रोजी रवींद्र नाट्य मंदिरात मी चुकीच्या पद्धती शिवसैनिकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला, त्याच वेळी उद्धवजींनी मला पक्षातून काढण्याची मागणी केली. मी राजीनामा दिल्यानंतर बाळासाहेबांनी मला फोन केला. जेव्हा हे उद्धव ठाकरेंना समजले, तेव्हा ते बाळासाहेबांकडे गेले.राणे पक्षात परत आल्यास मी आणि रश्मी ठाकरे घर सोडून जाऊ, अशी धमकी उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना दिल्याचा गौप्यस्फोट राणेंनी आत्मचरित्रातून केला आहे. काही प्रामाणिक शिवसैनिकांकडून मला समजल्याचं राणेंनी सांगितलं आहे. मनोहर जोशींमुळेच शिवसेनेची वाट लागल्याचा उल्लेखही राणेंनी केला आहे. माझ्यासाठी मुख्यमंत्रिपद सोडावं लागल्यानं जोशींच्या मनात एक प्रकारचा राग होता. वरकरणी जरी जोशी शिवसेनेचे चिंतक असल्याचे वाटत असले तरी त्यांच्या निर्णयामुळे पक्षाची आज अशी परिस्थिती झाली आहे. जोशी उद्धवजींच्या जवळचे होऊ लागले होते. पद्धतशीरपणे त्यांनी विरोधी नेत्यासाठी सुभाष देसाईंचं नाव पुढे केलं.  

 

काँग्रेसने 'विश्वास' जिंकला अन् उद्धव ठाकरेंचा 'विश्वास' उडाला; राणेंनी सांगितली पडद्यामागची गोष्ट

 

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे हे आत्मचरित्र लिहिणार असल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालं होतं. नारायण राणेंचे पुत्र नितेश राणे यांनी ट्विट करून यासंदर्भातील माहिती दिली होती. तसेच टविट्च्या शेवटी 'अब आएगा मजा, सबका हिसाब होगा'' असे सांगत नितेश राणे यांनी नारायण राणेंच्या आत्मचरित्रामधून अनेक धक्कादायक गौप्यस्फोट होणार असल्याचे संकेतच दिले होते. एक सामान्य शिवसैनिक ते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असा प्रवास नारायण राणे यांनी केला होता. त्यानंतर त्यांनी विरोधी पक्षनेत्याची भूमिकाही प्रभावीपणे बजावली होती. तसेच शिवसेनेमध्ये मतभेद झाल्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तसेच महसूल तसेच उद्योगमंत्री म्हणून काम पाहिले होते. त्यानंतर राणेंनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. तसेच ते भाजपाच्या पाठिंब्यावर राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून आले आहेत. 

टॅग्स :नारायण राणे