Join us  

लंडनमध्ये वडापावच्या व्यवसायातून दोन मुंबईकरांची कोटींची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2017 6:24 PM

ठळक मुद्देमुंबईकरांसाठी वडापाव म्हणजे सकाळचा नाष्टा, दुपारचं जेवण आणि कधी-कधी रात्रीचंही जेवण.सगळ्यात कमी पैशात पोट भरणाऱ्या वडापावमुळे मुंबईत कोणीच उपाशी झोपत नाही.म्हणून लंडनच्या रस्त्यावर वडापाव विकण्याची युक्ती त्या दोघांच्याही डोक्यात आली.

लंडन : सकाळचा नाष्टा, दुपारचं जेवण आणि जमलंच तर रात्रीचंही जेवण ज्या वडापाववर होतं त्या मुंबईकरांसाठी वडापावविषयी काही नव्याने सांगायची गरज नाही. मुंबईत कोणीच उपाशी झोपत नाही, त्यामागेच सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे कमी पैशात पोट भरणारा वडापाव. याच वडापावने दोन तरुणांना त्यांचा रोजगार मिळवु दिला आहे. एवढंच नाही, तर या तरुणांनी वडापावच्या जोरावर कोटींचा गल्ला जमवला आहे. १० ते १५ रुपयात मिळणारा वडापाव ४ कोटींच्या उलाढालीचा व्यवसाय कसा देऊ शकतो असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. मात्र यामागे तेवढीच रंजक कहानी आहे. 

२००९ साली जगभरात आर्थिक मंदी आली होती. त्याकाळी सगळ्यांच्याच नोकऱ्या  गेल्या. कॉस्ट कटिंगच्या नावाखाली कित्येक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढून टाकलं. लाखो लोक बेरोजगार झाले. त्यापैकीच एक सुबोध जोशी आणि सुजय सोहानी. लंडनमध्ये एका नामांकित कंपनीत काम करत असलेल्या या दोघांच्या नोकरीला ग्रहण लागले. हातातले उरलेले पैसेही संपले. उच्चशिक्षण घेऊन परदेशात आलेल्या या दोघांकडे आता भारतात परतण्यापलीकडे काहीच मार्ग नव्हता. मात्र त्यासाठीही त्यांच्या खिशात पैसे नव्हते. या काळात नोकरी गेलेला प्रत्येकजण मानसिक तणावात होता. सुबोध आणि सुजय हेसुद्धा त्याला अपवाद नव्हते. पण या संकंटातूनही त्यांनी स्वत:ला सावरायचं ठरवंल. लंडनच्या रस्त्यावर वडापाव विकण्याची युक्ती त्या दोघांच्याही डोक्यात आली. आणि त्यांच्या या युक्तीनेच त्यांना आता करोडपती बनवलंय.

सुबोध जोशीचं बालपण मुंबईतल्या वडाळ्यात गेलेलं तर सुजय मुळचा ठाण्याचा. दोघेही १९९९ साली वांद्राच्या रिझवी कॉलेजमधून ग्रॅज्यूएट झालेले. मुंबईतच बालपण आणि तरुणपण गेल्यामुळे वडापावचं महत्त्व या दोघांच्याही आयुष्यात फार मोलाचं होतं. हातची नोकरी गेली तेव्हा त्यांच्याकडे वडापाव खायला पैसे नव्हते म्हणूनच त्यांनी लंडनकरांना मुंबईचा वडापाव खाऊ घालायचं ठरवलं. १५ ऑगस्ट २०१० साली त्यांनी लंडनच्या एका रस्त्यावर ‘श्रीकृष्ण वडापाव’ नावाचा स्टॉल टाकला. तेथील एका मोठ्या आईसक्रीम पार्लरवाल्याशी संगनमत करून त्यांनी एक जागा बळकावली. त्यावेळी त्या जागेचं भाडं जवळपास ३५ हजार होतं. त्यांनी त्यांच्या दुकानात वडापाव आणि दाबेली विकायला सुरुवात केली. वडापाव ८१ रुपये (१ पाऊंड) तर दाबेली १३१ (१.५ पाऊंड)रुपये. मात्र सुरुवातीला त्यांना फार कमी प्रतिसाद मिळाला. आपल्या प्रॉडक्टचं योग्यरित्या मार्केटिंग करायला हवं असं त्यांना वाटलं. त्यासाठी त्यांनी अनेक युक्त्या आखल्या. त्याचपैकी एक म्हणजे त्यांनी वडापावला इंडियन बर्गर असं नाव दिलं. मार्केटींगसाठी त्यांनी असा दावा केला की इतर बर्गरप्रमाणे हा बर्गर स्वादिष्ट आणि स्वस्त आहे. सुरुवातीला त्यांनी लोकांना टेस्ट कळावी याकरता फुकट वडापाव विकला. त्यानंतर मात्र त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत गेला. दिवसेंदिवस त्यांच्या स्टॉलवर ग्राहकांची गर्दी वाढत गेली. त्याचकाळात लंडनमधील एका पंजाब रेस्टॉरंटच्या मालकांनी त्या दोघांनाही भागीदारीचा प्रस्ताव ठेवला. हा प्रस्ताव सुबोध आणि सुजय दोघांनाही आवडला. 

सात वर्षांपूर्वी एक छोटासा स्टॉल म्हणून सुरू झालेला हा प्रवास आता ४ शाखांनी बहरलाय. लंडनच्या स्विगींग शहरात त्यांच्या चार शाखा आहेत. या चारही शाखांचा टर्नओव्हर  जवळपास ४.४ कोटी (५० हजार पाऊंड)इतका आहे. आर्थिक मंदीच्या काळात ज्यांना नोकरीवरून काढून टाकलं होतं तीच दुकली आता ४ कोटींचे मालक आहेत. आलेल्या संकटाला घाबरून पळवट शोधण्यापेक्षा संकटालाच संधी समजून नव्याने सुरुवात करायची असते असं या दोघांनी पटवून दिलंय.  मानसिक तणावातही आपल्या उदरनिर्वाहाची सोय करणाऱ्या या तरुणांनी भारताला आणि मुख्यत्वे मुंबईकरांना अभिमान वाटेल असंच काम केलंय.

सौजन्य - www.kenfolios.com

टॅग्स :मुंबईअन्नलंडन