नवी मुंबई : शहरात सोनसाखळी चोरांचा धुमाकूळ सुरूच आहे. दोन दिवसांमध्ये चार महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावल्याची घटना घडली आहे. चेंबूरमधील रहिवासी वनगा माधव शेट्टी या शनिवारी कामानिमित्त सानपाडा येथे आल्या होत्या. येथील स्वामी विवेकानंद शाळेजवळून जात असताना चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील १० हजार रूपये किमतीची सोनसाखळी हिसकावून नेली आहे. सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. रविवारी सायंकाळी ७ वाजता घणसोलीमध्येही सोनसाखळी चोरीची घटना घडली आहे. सेक्टर ७ मध्ये राहणार्या स्वाती गोंधळेकर या येथील पटेल अपार्टमेंटजवळून पायी जात होत्या. दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळयातील ८३ हजार रूपये किमतीचे दागिने हिसकावून नेले आहेत. शिरवणेमध्ये राहणार्या गौरी मोरे या रविवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास सायन - पनवेल महामार्गावर एल. पी. जवळ रस्ता ओलांडत होत्या. त्यावेळी अनोळखी व्यक्तीने मागून येवून त्यांच्या गळ्यातील ४० हजार रूपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावून नेले आहे. घणसोलीमधील आदर्श बारजवळ अशीच घटना घडली आहे. सेक्टर १ मध्ये राहणार्या राजश्री जावळे या रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास पायी जात असताना चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ९० हजार रूपये किमतीचे दागिने हिसकावून नेले आहेत. चारही घटनांविषयी संबंधित पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. (प्रतिनिधी)
दोन दिवसांमध्ये चार महिलांचे दागिने हिसकावले
By admin | Updated: May 20, 2014 02:23 IST