पनवेल : कोणत्याही परिस्थितीत जून महिन्यापर्यंत पडघे येथील आदिवासी मुलांच्या वसतिगृहाकरिता पर्यायी जागा मिळवून देऊ, असे आश्वासन आदिवासी विकास मंत्र्यांनी दिले होते. मात्र जून महिना उलटला तरी आश्वासनपूर्ती न झाल्याने ते हवेतच विरले की काय, अशा प्रश्न आदिवासी मुलांकडून विचारण्यात येत आहे.पडघे येथील वसतिगृहाला पाचशे विद्यार्थ्यांची मान्यता असल्याने त्याकरिता मोठ्या जागेची गरज आहे. त्यामुळे २0१0 साली पडघे कोळवाडा येथे एकूण ९ हजार चौरस फूट जागेवर आदिवासी विद्यार्थ्यांचे वसतिगृह सुरू करण्यात आले. तिथे प्रशस्त खोल्या, शौचालय, चोवीस तास पाणी, मोकळी हवा या सर्व गोष्टी आहेत. मात्र हे ठिकाण पनवेलपासून दूर पडते. शिवाय वाहतुकीसाठी गैरसोयीचे आणि आर्थिकदृट्या न परवडणारे आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी वसतिगृह दुसऱ्या ठिकाणी हलविण्याची तयारी प्रकल्प अधिकाऱ्यांनी एक वर्षापूर्वीच केली आहे. विद्यार्थ्यांकडूनही तशी मागणी गेल्या काही महिन्यांपासून होत आहे. त्यानुसार पर्यायी जागेचा शोध घेण्यात आला.तत्कालीन गृहपालांनी विद्यार्थी प्रतिनिधींना बरोबर घेऊन कामोठे, खारघर, आकुर्ली, पनवेल, करंजाडे या ठिकाणी इमारती पाहिल्या. गेल्या काही महिन्यांत जवळपास ५० पेक्षा जास्त जागा पाहण्यात आल्या आहेत. मात्र शासकीय वसतिगृह असल्याने अनेकांनी जागा देण्यास नकार दिला. पडघे येथील आदिवासी वसतिगृहाकरिता कमीत कमी २० हजार चौरस फूट क्षेत्रफळाची आवश्यकता आहे. इतकी मुबलक जागा पनवेल किंवा आजूबाजूला मिळाली नाही. आम्हाला नवीन जागा पाहिजे, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे. आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी जूनमध्ये वसतिगृह नवीन जागेत शिफ्ट होईल, असे आश्वासन दिले होते. मात्र त्याती पूर्तता न झाल्याने यंदा पुन्हा आंदोलन होण्याचे चिन्ह निर्माण झाले आहे. (प्रतिनिधी)
आदिवासी विद्यार्थ्यांच्या नशिबी पडघेच
By admin | Updated: July 12, 2015 01:01 IST