ठाणे : महापालिकेची वृक्ष प्राधिकरण समिती ही वृक्षतोड समिती झाल्याचे मान्य करून आयुक्त असीम गुप्ता यांनी यापुढे महापालिका हद्दीत वृक्षतोडीला परवानगी न देता त्यांचे पुनर्रोपण करावे, असे सूचित केले जाणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच नियमानुसार वृक्ष लागवड केली नाही तर या पुढे विकासकाला ओसी (भोगवटा प्रमाणपत्र) दिली जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.काही प्रस्ताव मंजूर करताना तेथील वृक्षांची छायाचित्रे पाहण्यात आली होती. त्यानंतरच ते विषय मंजूर करण्यात आले. काही ठिकाणचे वृक्ष मृतावस्थेत होते, तर काही मृत झाले होते. त्यांनाच परवानगी देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ही परवानगी देत असताना विकासकांनी एक वृक्षाच्या बदल्यात पाच वृक्ष लावण्याचा प्रस्तावही या वेळी मंजूर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. परंतु, सोसायटीच्या ठिकाणी तसे प्रकार नव्हते, त्यामुळे त्यांना परवानगी नाकारण्यात आली़विकासकाने वृक्ष तोडल्यास त्याच्याकडून अनामत रक्कम पालिका घेत असते. परंतु, ती परत घेण्यास कोणीही पुढे येत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे हे विकासक वृक्ष लावतात अथवा नाही, याबाबतही पालिका संभ्रमावस्थेत असल्याचे आयुक्तांच्या या वक्तव्यावरून दिसून आले. एका विकासकाने दोनदा परवानगी मागितली असल्यास त्याचा पूर्वेतिहास तपासला जात नसल्याचेही या वेळी आयुक्तांनी मान्य केले. परंतु, यापुढे वृक्ष तोडताना अनामत रक्कम तर घेतली जाणार असून वृक्ष न लावल्यास विकासकाला ओसी दिली जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच जे वृक्ष मृतावस्थेच्या मार्गावर असतील अथवा मृत झालेले असतील, तेच तोडण्याची परवानगी दिली जाणार असून जे वृक्ष चांगल्या स्थितीत असतील आणि ते तोडण्याची परवानगी मागितल्यास संबंधितांना त्या वृक्षांचे पुनर्रोपण करावे लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले. याशिवाय, पाच नवीन वृक्षसुद्धा लावावे लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, वृक्ष प्राधिकरण समितीवर तज्ज्ञ व्यक्तीसुद्धा असाव्यात, असे कायद्यात म्हटले असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
वृक्षतोड न होता होणार पुनर्रोपण
By admin | Updated: July 13, 2014 23:38 IST