वैभव गायकर, पनवेलनगरपरिषदेमार्फत करोडो रुपये खर्चून उभारलेल्या व्यापारी संकुलात अनेक समस्या आ वासून आहेत. तक्रारी करूनही नगरपरिषद दखल घेत नसल्यामुळे आमच्यासाठी अच्छे दिन कधी येणार, असा संतप्त सवाल व्यापारी करीत आहेत. व्यापारी संकुलात दोनशेपेक्षा जास्त गाळे आहेत. लाखो रुपये मोजून विकत घेतलेल्या या गाळ्यांच्या मालकांना नगरपरिषदेमार्फत कोणत्याच सुविधा पुरविल्या जात नाहीत. अनेक ठिकाणी विजेच्या वाहिन्या लटकताना दिसतात. पावसाळ्यात या वाहिन्यांमुळे मोठी दुर्घटना होऊ शकते. व्यापारी संकुलामधील इमारत क्रमांक ३ मधील स्वच्छतागृहाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. वेळेवर साफसफाई होत नसल्यामुळे दुर्गंधीयुक्त पाणी बाहेर आले आहे. त्यामुळे याठिकाणी रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. व्यापारी संकुलात रात्रभर ओल्या पार्ट्या होत असल्याचे याठिकाणी पडलेल्या दारूच्या बाटल्यांवरून दिसून येत आहे. संकुलाला अनधिकृत फेरीवाल्यांचा वेढा, स्वच्छतागृहातील खिडक्यांची तावदाने गायब झाल्याने महिलांची देखील मोठी गैरसोय याठिकाणी झाली आहे. संकुलाच्या देखरेखीसाठी नगरपरिषदेने एका एजन्सीची नेमणूक केली आहे. मात्र ही एजन्सी देखरेख करीत नाही. अधिकारी व कंत्राटदारांचे साटेलोटे असल्याचा आरोप शिवसेनेचे गटनेते रमेश गुडेकर यांनी केला आहे.
पनवेलच्या व्यापारी संकुलाची दुरवस्था
By admin | Updated: June 23, 2015 00:34 IST