मुंबई : गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या कोकणवासियांना मध्य रेल्वेकडून खुशखबर देण्यात आली आहे. गणेशोत्सवासाठी ६0 विशेष फेऱ्या १0 सप्टेंबरपासून सोडण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यांच्या तिकिट आरक्षणाबाबत लवकरच माहीती देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे कोकणवासियांचा प्रवास सुकर होण्यास मदत होईल, अशी आशा मध्य रेल्वेकडून व्यक्त करण्यात आली. या विशेष फेऱ्यांनंतर आणखी काही फेऱ्यांचीही घोषणा केली जाणार आहे. रेल्वेने गणेशोत्सवकाळात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना नेहमीच गर्दीचा सामना करावा लागतो. नियमित गाड्यांमध्ये कोकणवासियांना वेटिंग लिस्टवरच राहावे लागते. हे पाहता मध्य रेल्वेकडून विशेष फेऱ्या चालवण्यात येतात. यावेळीही मध्य रेल्वेकडून विशेष फेऱ्या चालवण्यात येत असून प्रथम ६0 विशेष फेऱ्यांची घोषणा करण्यात आली आहे. यात सीएसटी ते मडगाव ट्रेनच्या ३४ फेऱ्या होणार असून ही ट्रेन गुरुवार वगळता अन्य सहा दिवशी धावणार आहे. ११ सप्टेंबर ते २९ सप्टेंबरपर्यंत या ट्रेनच्या फेऱ्या होतील. त्यानंतर सीएसटी ते मडगाव ही आणखी एक ट्रेन १0 सप्टेंबर ते १ आॅक्टोबरपर्यंत सोडण्यात येत असून त्याच्या आठ फेऱ्या होणार असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेन्द्र पाटील यांनी सांगितले. ही ट्रेन फक्त गुरुवारी धावेल. त्याचप्रमाणे दादर ते सावंतवाडी विशेष ट्रेनही सोडण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याच्या अठरा फेऱ्या होतील. ही ट्रेन ११ सप्टेंबर ते ३0 सप्टेंबरपर्यंत आठवड्यातून तीन दिवस धावणार आहे.
कोकणवासीयांसाठी रेल्वेची खूशखबर!
By admin | Updated: June 23, 2015 01:06 IST