मुंबई : भाजपाची सत्ता येताच मंत्रिपदाचे स्वप्न पडलेल्या खासदार किरीट सोमय्या यांनी निकालानंतर मुंबईतील मुख्य अशा रेल्वे प्रश्नांवर लक्ष केंद्रित केले आणि यामुळे रेल्वे अधिकार्यांची पुरती दमछाक सुरू झाली. किरीट सोमय्या यांना रेल्वे राज्यमंत्री पद मिळणार, अशी चर्चा असल्यानेच सोमय्यांकडून काही दिवसांत रेल्वे प्रश्न तडीस नेण्याचा प्रयत्न तर केला जात नाही ना, अशा अनेक चर्चांना उधाण आले आहे. सोमय्या यांनी बुधवारी कांजूरमार्ग स्थानकातील समस्यांची आणि होणार्या प्रकल्पांची माहिती घेतली. मात्र उन्हातान्हातून फिरताना आणि ही माहिती देताना रेल्वे अधिकार्यांची चांगलीच फरफट झाली. कांजूरमार्ग स्थानकात गर्दीच्या वेळेत या स्थानकात प्रवाशांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. या स्थानकाजवळ रूळ ओलांडताना अपघातही होत असल्याचे निदर्शनास आल्याचे रेल्वेकडून या स्थानकात सुविधा देण्याचा निर्णय घेतला आणि एमआरव्हीसीच्या (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) ट्रॅक क्रॉसिंग रोखण्याच्या प्रकल्पांतर्गत त्याचा विकास करण्याचा निर्णय झाला. या स्थानकात एक नंबर प्लॅटफॉर्मच्या विरुद्ध दिशेलाच (पश्चिमेला) आणखी एक प्लॅटफॉर्म, तसेच दोन पादचारी पूल, दोन नंबर प्लॅटफॉर्मवर सरकता जिना आणि या स्थानकात पालिका आणि रेल्वेच्या पादचारी पुलाची जोडणी केली जाणार आहे. या प्रकल्पाला डिसेंबर महिन्यातच मंजुरी मिळाली असून, त्याचे थोडे कामही सुरू केले आहे, तरीही याची माहिती असलेल्या किरीट सोमय्या यांनी बुधवारी मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक मुकेश निगम आणि इतर वरिष्ठ अधिकार्यांना घेऊन पाहणी केली. प्रथम कल्याणच्या अखेरीस पादचारी पुलावर असलेल्या तिकीट खिडकी सेवेची पाहणी रेल्वे अधिकार्यांनी केल्यावर त्याच ठिकाणी किरीट सोमय्या यांनी बैठक घेऊन चर्चेला सुरुवात केली. प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, कॅमेर्यांचा लखलखाट पाहताच सोमय्या हे रेल्वे अधिकार्यांना स्टेशनचा संपूर्ण नकाशाच उघडून आपल्या ‘स्टाईल’प्रमाणे समजावू लागले. एका फोटोग्राफरने फोटो काढायचे असल्याचे सांगताच सर्व वरिष्ठ रेल्वे अधिकार्यांना घेऊन सोमय्या हे अक्षरश: पाच ते सात मिनिटे फोटोसेशन करीत बसले. त्यानंतर सोमय्या हे रेल्वे अधिकार्यांना घेऊन तर उन्हातान्हातून संपूर्ण स्थानक आणि ट्रॅकजवळ तब्बल अर्धा तास फिरत राहिले आणि यामुळे रेल्वे अधिकार्यांची चांगलीच दमछाक झाली. या दमछाकीनंतर ट्रॅकच्याच बाजूला असलेल्या रेल्वेच्या एका कंटेनर आॅफिसमध्ये जाऊन सोमय्या आणि तीन वरिष्ठ रेल्वे अधिकारी चर्चेसाठी बसले. एसी आॅफीसमध्ये सर्वजण बसलेले असतानाच तोपर्यंत इतर अधिकारी, कर्मचारी, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, सोमय्या यांचे कार्यकर्ते मात्र २० मिनिटे बाहेर उन्हात ताटकळत उभेच राहिले. अखेर बाहेर आल्यावर छोटी पत्रकार परिषद घेऊन करीत असलेल्या कामांची माहिती आणि इतर प्रश्नांना उत्तर देऊन सव्वा तासाच्या या पाहणी दौर्यानंतर किरीट सोमय्या आपल्या कार्यकर्त्यांसह निघून गेले. (प्रतिनिधी)
सोमय्या दौर्यामुळे रेल्वे अधिकार्यांची दमछाक
By admin | Updated: May 22, 2014 03:17 IST