वडखळ : मे महिन्याचा शेवटचा रविवार आणि संपणाऱ्या उन्हाळी सुटीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी अलिबाग मुरुडला पसंती दिल्याने मुंबई - गोवा महामार्गावर प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. मुंबई- गोवा महामार्गाच्या चौपरीकरणाच्या कामाला गती नसल्याने व महामार्गावरील खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीत भर पडते तर या भागात वाढत असलेल्या औद्योगिकीकरणामुळे येथील कारखान्यातून अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणावर येथून होते. ही वाहने रस्त्यातच बंद पडत असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. पर्यटकांनी सुटीचा आनंद घेण्यासाठी अलिबाग, मुरु डला पसंती दिल्याने मुंबई - गोवा महामार्गावर वाहतुकीचे प्रमाण वाढले. कार, जीप, बसेस आदी वाहनांमधून मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आदी ठिकाणाहून अगदी परराज्यातून देखील लाखो पर्यटक अलिबाग, मुरु डच्या दिशेने निघाल्याने वारंणार येथे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. सध्या पांढऱ्या कांद्याचा, आंब्याचा हंगाम सुरु असल्याने पर्यटक मध्येच पांढरे कांदे, आंबे खरेदी करण्यासाठी आपली वाहने थांबवत असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत असल्याचे निदर्शनास आले. मुंबई - गोवा महामार्गावर वडखळ नाका पेण- रामवाडी ब्रिज, पेण रेल्वे स्टेशन या भागात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागली. वाहन चालक व पर्यटकांनी मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम लवकरात लवकर करण्याची मागणी या वेळी केली. (वार्ताहर)
मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी
By admin | Updated: May 31, 2015 22:25 IST