उल्हासनगर : स्थानिक संस्था करप्रणाली अंतर्गत सदोष दंडात्मक रकमेची आकारणी महापालिकेकडून करण्यात येत आहे. याविरोधात व्यापारी न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याची माहिती प्रकाश कुकरेजा यांनी दिली आहे. सदोष एलबीटीच्या वसुलीमुळे उत्पन्न कमी होऊन महापालिकेला कोट्यवधींचा तोटा सहन करावा लागत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. महापालिकेत जकातीऐवजी सुरू झालेल्या स्थानिक संस्था कर प्रणालीमुळे जकातीपेक्षा उत्पन्न मिळाले आहे. एका वर्षात पालिकेला १०० कोटींचे नुकसान झाले असून, उत्पन्नाअभावी महापालिकेची विकासकामे ठप्प पडली आहेत. राजकीय हस्तक्षेपामुळे एलबीटी विभागात सावळागोंधळ निर्माण होऊन एलबीटीचे उत्पन्न कमी झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. महापालिका आयुक्तांनी, एलबीटी विभागात लक्ष केंद्रित करून वादग्रस्त अधिकार्यांची उचलबांगडी केली आहे. तरीही एलबीटी ९ कोटींपेक्षा जास्त जात नसल्याने विभागप्रमुख श्रीधर पाटणकर वादाच्या भोवर्यात सापडले आहेत. यापूर्वी दरमहा १३ कोटींचे एलबीटी उत्पन्न आले आहे. १६ हजारांपेक्षा जास्त व्यापार्यांची नोंद होऊनही उत्पन्न वाढत नसल्याने याला अधिकारी व स्थानिक नेतेच जबाबदार असल्याची चर्चा पालिकेच्या वर्तुळात आहे. एलबीटी कर चुकविणार्या व्यापार्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असून, पाच पट दंड आकारला जात आहे. हा दंड सदोष असल्याचे मत प्रकाश कुकरेजा यांनी व्यक्त केले आहे. दंडात्मक कारवाईने व्यापारी संतप्त झाले असून, ही रक्कम रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)
एलबीटी वसुलीबाबत व्यापारी आक्रमक
By admin | Updated: May 21, 2014 04:38 IST