- प्राची सोनवणे, नवी मुंबई
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल लागताच दुसऱ्या दिवसापासून आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली. आॅनलाइन केंद्रीय प्रवेश प्रक्रियेमध्ये आॅनलाइन अर्ज करण्याचा आजचा (शुक्रवार) शेवटचा दिवस असून १ लाख ८५ हजार १६३ विद्यार्थ्यांचे अर्ज प्रवेशासाठी पोहोचले आहेत. मुंबई विभागात ११५६ मान्यताप्राप्त विद्यालये असून विज्ञान शाखेसाठी ८१,४३१ जागा उपलब्ध आहेत. वाणिज्य शाखेसाठी १,५३,६७२ तर कला शाखेसाठी ३४,०६४ जागा उपलब्ध आहेत. नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, ठाणे, मुंबई (दक्षिण), मुंबई (उत्तर), मुंबई (पश्चिम), आदी विभागातून आॅनलाइन अर्ज दाखल झाले आहेत. आतापर्यंत प्रवेशासाठी १ लाख ८५हजार १६३ अर्ज पोहचले आहेत. यामध्ये एसएससी मंडळाच्या विद्यार्थ्यांचे अर्ज १ लाख ९४ हजार त्यापाठोपाठ सीबीएसई मंडळाचे ५ हजार ०४७ आणि आयसीएसई मंडळाचे ८ हजार ४४९ अर्ज आले आहेत. अकरावी प्रवेशाकरिता नोंदणी केलेल्या एकूण २ लाख ११ हजार ४७ विद्यार्थ्यांपैकी १ लाख ८५ हजार १६३ विद्यार्थ्यांचे अर्ज ‘सबमिट’ आणि ‘कन्फर्म’ झाले आहेत. २५ हजार ८८४ नोंदित विद्यार्थ्यांनी अजूनही अर्ज सादर केले नाहीत. ३५ हजार विद्यार्थ्यांचे अर्ज अर्धवट अवस्थेत आहेत, तर त्यापैकी १२ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज अर्धवट अवस्थेत सोडलेले आहेत. अर्जाचे पहिले दोन टप्पे पूर्ण भरून अर्ज ‘सबमिट’ आणि ‘कन्फर्म’ करण्यासाठी शुक्रवारपर्यंतची मुदत असणार आहे. १ लाख ६४ हजार ५२७ इनहाऊस जागा उपलब्ध आहेत. इनहाऊस कोटा म्हणजे जर तुम्ही ज्या शाळेतून उत्तीर्ण झाला आहात त्याच शाळेत जर महाविद्यालयीन शिक्षणाची सोय असल्यास तिथे तुम्हाला २० टक्के राखीव देण्यात येतात. ४०,५१८ अल्पसंख्याक जागा उपलब्ध आहेत. अल्पसंख्याक संस्था म्हणजे ज्या व्यवस्थापनामार्फत कनिष्ठ महाविद्यालय चालविण्यात येत आहे, त्या व्यवस्थापनाच्या स्तरावरून नियमानुसार भरण्यात येणाऱ्या ५ टक्के जागा. अल्पसंख्याक कोटा म्हणजे ज्या अल्पसंख्याक संस्थेमार्फत कनिष्ठ महाविद्यालय चालविण्यात येत आहे त्या अल्पसंख्याक प्रवर्गातून संस्था स्तरावरून भरणाऱ्या ५० टक्के जागा.