मनोहर कुंभेजकर, मुंबईएकीकडे मुंबईच्या वर्सोवा, जुहू आणि आक्सा येथे समुद्रात पोहण्यासाठी गेलेले तरुण बुडण्याच्या घटना सातत्याने घडत असताना उद्या ४ आॅगस्ट रोजी पालिकेच्या अग्निशामक खात्यात कार्यरत असलेल्या ३१ कंत्राटी आणि ८ हंगामी जीवरक्षकांना पालिका प्रशासनाने चक्क एक दिवसाचा ब्रेक दिला आहे. पालिका प्रशासनाचा हा निर्णय आत्मघातकी असून, ४ आॅगस्टला या तसेच अन्य बीचवर बुडण्याच्या घटना घडल्या तर जबाबदार कोण, असा सवाल पलिकेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र (बाळा) आंबेरकर यांनी केला आहे. या प्रकरणी आपण पालिका आयुक्तांची भेट घेऊन त्यांना हा निर्णय मागे घेण्यास भाग पाडू, अशी माहिती त्यांनी दिली. दरम्यान, गेली ३६ वर्षे जीवरक्षक म्हणून काम केलेले रजनीकांत माशेलकर म्हणाले की, ३१ हजार कोटींचा वार्षिक अर्थसंकल्प असलेल्या महापालिका प्रशासनाने खरेतर या कंत्राटी आणि हंगामी जीवरक्षकांना पालिकेच्या नोकरीत कायम केले पाहिजे. कंत्राटी जीवरक्षकांना दरमहा १0 हजार रु पये आणि हंगामी जीवरक्षकांना दरमहा ८ हजार रुपये इतके तुटपुंजे वेतन पालिका देते. त्यांना कोणत्याही सुविधा आणि सुरक्षितता नाही. डोळ्यांत तेल घालून ते बीचवर गस्त ठेवतात. तरु णांचे जीव त्यांनी वाचवले आहेत. विशेष म्हणजे माशेलकर गेल्या नोव्हेंबरमध्ये सेवानिवृत झाले तरी रोज सामाजिक बांधिलकी म्हणून ते आक्सा बीचवर गस्त घालतात. आपल्या अनुभवाचा फायदा ते येथील जीवरक्षकांना देतात. आजची तरु ण मुले ऐकतच नाहीत. आपला जीव धोक्यात घालून पाण्यात उतरतात. त्यामुळे बुडण्याच्या घटना वाढतच असून, मुंबईच्या बीचवर अजून किमान ५0 ते ६0 जीवरक्षकांची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
जीवरक्षकांना आज एक दिवसाचा ब्रेक
By admin | Updated: August 4, 2014 01:39 IST