मुंबई : मालवणीत विषारी दारू पिऊन बाधा झाल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या आकड्यामध्ये वाढ होत असल्याने त्यांच्या अन्त्य संस्कारांसाठी स्मशानेही कमी पडु लागली आहेत. त्यामुळे भर पावसात खांद्यावर मृतदेह घेऊन स्मशान शोधत फिरण्याची वेळ नातेवाईकांवर येत आहे. मालाडच्या आणि मालवणी परिसरात मढ, मालवणीच्या चारकोप नाक्या जवळील हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन स्मशानभुमी तसेच मालाडच्या चिंचोली बंदर याठिकाणी तीन स्मशान भुमी आहेत. त्यामुळे यात मढ ला तीन, मालवणीला चार आणि चिंचोलीला चार अशा अकरा जागा आहेत ज्याठिकाणी मृतांना अग्नी देण्याची सोय केलेली आहे. मात्र यावेळी मारणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने मृतदेह जास्त वेळ रुग्णालयात ठेवणेही शक्य नाही. तसेच तो घरी पाठविल्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार ही लवकरत लवकर करणे गरजेचे आहे. त्यातच गेल्या तीन दिवसांपासून पावसाने धुमशान घातले आहेत. मालवणी, गावदेवी, राठोडी तसेच खारोडी परिसरातुन रात्रभर मृतदेह स्मशानभूमीकडे आणले जात आहेत. मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने नातेवाईक आणि स्थानिकांची मोठ्या प्रमाणात दमछाक होत आहे. 'आम्ही सर्व ठिकाणी लोकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेत आहोत. यावेळी मृत्युमुखी पावेल्यांची संख्या अधिक आहे. त्यातच मुस्लिम आणि ख्रिस्चन बांधवांसाठी पुरेशी जागा उपलब्ध आहे. मात्र हिंदू बांधवांना अग्नी देताना त्यापुर्वी काही धार्मिक विधी करून नंतरच संबंधित व्यक्तीला अग्नी दिला जातोय, त्यामुळे कदाचित थोडा विलंब होत असावा', अशी माहिती पी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त देवेंद्रकुमार जैन यांनी 'लोकमत' शी बोलताना दिली. दरम्यान, कांदिवली पश्चिमच्या डहाणूकर वाडीमध्ये असलेल्या स्मशान भूमित मृतदेह नेण्याची पाळी लोकांवर येत आहे.
अंत्यसंस्कारासाठीही दमछाक; स्मशानेही पडली अपुरी
By admin | Updated: June 21, 2015 01:40 IST